तंटामुक्त गावांच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम साधारणत: पावणे दोन महिन्यांचा असून या काळात विहित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊन शासन स्तरावरून तंटामुक्त गावांची घोषणा करण्यात येते. सलग चार वर्ष पाळले गेलेले हे वेळापत्रक पाचव्या वर्षांत मात्र कोलमडले. सहाव्या वर्षांतील उपरोक्त प्रक्रियेची सुरूवात होण्यास काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील पाचव्या वर्षांतील तंटामुक्त गावांची नांवे जाहीर करण्यात आली.
१ मे रोजी ज्या गावांनी ग्रामसभा घेऊन गाव तंटामुक्त झाल्याचे जाहीर केले असेल आणि अध्यक्ष व निमंत्रकांच्या स्वाक्षरीने स्वयंमूल्यमापन अहवाल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे २ मे पूर्वी पाठविला असेल, अशा गावांचे मूल्यमापन केले जाते. तंटामुक्त गावांच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम शासनाने निश्चित करून दिला आहे. त्यानुसार १५ एप्रिलपूर्वी जिल्हा मूल्यमापन समित्यांची स्थापना केली जाते. ३० एप्रिलपूर्वी मूल्यमापनाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरचा टप्पा असतो, तो पाच मेपूर्वी जिल्हा मूल्यमापन समित्यांना तालुक्यांचे वाटप करण्याचा.
पाच मे ते पाच जून हा कालावधी जिल्हा मूल्यमापन समित्यांनी तंटामुक्त गावाचे जिल्ह्यांतर्गत मूल्यमापन करणे व अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर करण्यासाठी दिला जातो. पुढील पाच दिवसात म्हणजे १० जूनपूर्वी जिल्हास्तरीय कार्यकारी समित्यांनी जिल्हा मूल्यमापन अहवाल आणि जिल्हा बाह्य मूल्यमापनासाठी त्यांच्या जिल्ह्यातील मूल्यमापन समित्यांचा तपशील शासनास सादर करावा लागतो. जिल्हा बाह्य मूल्यमापनासाठी शासनामार्फत १५ जूनपूर्वी जिल्ह्यांचे वाटप झाल्यावर पुढील महिनाभराचा कालावधी जिल्हा बाह्य मूल्यमापनासाठी राखून ठेवण्यात आला आहे. २० जुलैपूर्वी जिल्हा बाह्य मूल्यमापन समित्यांकडून पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करावा लागतो. पुढील पाच दिवसात हा अहवाल जिल्हा कार्यकारी समितीच्या मान्यतेने शासनास सादर केला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यावर नऊ ऑगस्ट रोजी शासन स्तरावरून तंटामुक्त गावांची घोषणा केली जाते. शासनाने आखुन दिलेल्या वेळापत्रकानुसार चार वर्ष हा कार्यक्रम पार पडला असला तरी पाचव्या वर्षांत त्यात अडचणी उद्भवल्या. म्हणजे विहित प्रक्रिया पूर्णत्वास जाऊनही शासनाने सहा महिन्यांच्या विलंबानंतर तंटामुक्त गावांची यादी जाहीर केली. या मोहिमेसाठी खुद्द शासनाने निश्चित केलेल्या वेळापत्रकाचा पाचव्या वर्षांत स्वत:च अव्हेर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
    ल्लअनिकेत साठे
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील चौतीसावा लेख.