लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज
शहरासह परिसरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्यात घरांच्या पडझडीचाही समावेश आहे. यशवंतनगरमध्ये सायंकाळी भिंत कोसळून ओम कैलास कानडे (३) आणि लिलाबाई कानडे (६५) हे जखमी झाले.
आपत्कालीन स्थितीचा फटका बसलेल्या कुटूंबांना सहाय्य करावे, त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात येत असून एकटय़ा धुळे तालुक्यात अवघ्या तीन तासात ६३ मिलीमीटर तर शिरपूरमध्ये ३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दुपारी तीननंतर धुळेकरांनी पावसाच्या रौद्रावताराचा अनुभव घेतला. सुमारे साडेतीन तास पावसाने अक्षरश: शहराला झोडपून काढले. शहर जलयम झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि समितीलगत असलेल्या अतिक्रमित घरांमध्ये पाणी शिरले. घरांची पडझड झाल्याने संसारोपयोगी वस्तु, धान्य निकामी झाले.
शेजारीच वाहणाऱ्या लोंढा नाल्याला पूर आल्याने काही जण तेथेच अडकले. मदतीसाठी शेजारच्या वसाहतीतील रहिवाशी, समाजसेवकांनी धाव घेतली. एकटय़ा बाजार समितीत पावसामुळे किमान १५ ते २० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य बाजारपेठ, एसटी कॉलनी, खोल गल्ली, ताशा गल्ली, जिल्हा रुग्णालयाचा अपघात विभाग आदी ठिकाणी पाणी साचले.