नवी मुंबई आणि मुंबई दरम्यान वाढलेली वाहतूक लक्षात घेऊन सध्या वाशी खाडीवरील पुलाशेजारी दोन तीनपदरी पूल बांधण्याच्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या योजनेला आर्थिक चणचणीमुळे खो बसला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अपेक्षित अर्थस्ह्य’ा मिळत नसल्याने या दोन संस्थांमधील आपसांतील स्पर्धेतून महत्त्वाचा प्रकल्प रखडला आहे. मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर पडणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण सातत्याने वाढत असून भविष्यातील गरज ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शीव-पनवेल महामार्गाच्या रूंदीकरणाची योजना हाती घेण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सध्या वाशी खाडीवरील नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या पुलावर प्रचंड ताण येईल. त्यासाठी वाशी खाडीवरील पुलाशेजारीच नवी मुंबईकडे जाण्यासाठी तीनपदरी आणि मुंबईकडे येण्यासाठी तीन पदरी असे दोन पूल बांधून सध्याच्या पुलाचा विस्तार करण्याची ‘एमएसआरडीसी’ची योजना आहे. त्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत ३५ टक्के रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच उर्वरित रक्कम ‘एमएमआरडीए’ आणि ‘सिडको’ने उपलब्ध करावी अशी ‘एमएसआरडीसी’ची अपेक्षा होती. मात्र, ‘एमएमआरडीए’ला हा प्रकल्प पसंत नाही. प्राधिकरणातर्फे शिवडी ते न्हावा-शेवा सागरी सेतूचे काम हाती घेण्यात आले आहे. एकाच प्रदेशात जाणाऱ्या दोन समांतर आणि एकमेकांना स्पर्धक ठरतील अशा प्रकल्पांत ‘एमएमआरडीए’ निधी उपलब्ध करू शकत नाही, अशी भूमिका ‘एमएमआरडीए’ने घेतली आहे. त्यामुळे वाशी खाडीवरील विस्तारित पुलासाठी ‘एमएमआरडीए’कडून पैसा घेण्याच्या ‘एमएसआरडीसी’च्या मनसुब्यांना सुरूंग लागला.ं
‘एमएसआरडीसी’ आणि ‘एमएमआरडीए’ या दोघांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवरून नेहमीच संघर्ष होत आला आहे. त्यातूनच वाशी खाडीवरील या विस्तारित पुलाच्या प्रकल्पाला ‘एमएमआरडीए’ने विरोध केला आहे.
सरकारी यंत्रणांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मात्र नाहक भरडला जात आहे.