उद्योगमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अपयश असल्याची टीका करीत केंद्र सरकारने मुख्यमंत्री दिला, पण राज्यात नेता दिला नाही, असे मत माजी खासदार व काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी व्यक्त करून पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तोफ डागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा मुत्तेमवार आणि चव्हाण वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्या नेतृत्वावर राज्यातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी चव्हाण यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. मधल्या काळात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण हटाव मोहीम सुरू केली होती. मात्र, केंद्रीय नेतृत्वावाने त्यांच्यावर विश्वास टाकून लोकसभा निवडणुकीची त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पक्षातील काही नेते सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
नाारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर मुत्तेमवार ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांना राज्यात ज्या पद्धतीने सन्मान मिळायला हवा तो मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या पराभवाला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर राज्याची जबाबदारी दिली तर त्यांनी संघटनात्मक काम करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी विश्वास घेतले नाही. त्यांनी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले नाही. वारंवार दिल्लीला जाऊन राज्यातील नेत्यांची गाऱ्हाणी सांगून स्वतची इमेज मात्र चांगली ठेवली. विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर असताना त्यांच्यासमोर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना सांभाळणे हे मोठे आव्हान आहे. त्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढविल्या जाणार असल्यामुळे पुन्हा लोकसभेसारखी परिस्थिती निर्माण झाली तर नवल वाटू नये. राज्याला नेतृत्व मिळाले नसल्यामुळे कार्यकत्यार्ंचे संघटनात्मक काम कमी पडले आहे. अनेक नेत्यांना विश्वास न घेता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले आहे त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसमध्ये अनेक नाराज नेते पक्ष सोडून जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका बघता केंद्रीय नेतृत्वांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्याची गरज आहे, असेही मुत्तेमवार म्हणाले.