नाशिकसह सिन्नर येथील व्हीआयपी एम्प्लॉईज युनियनतर्फे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
कंपनीच्या २००४ च्या करारामध्ये कामगारांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ५६ करण्यात आले. व्हीआयपी कंपनीतील कामगारांनी त्यासंदर्भात आ. नितीन भोसले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी व्हीआयपीतील कामगारांवर झालेल्या अन्यायाला विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडून आवाज उठविला. त्यानंतर कामगार मंत्रालयात आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा होऊनही निर्णय होऊ शकला नाही. करारनामा संपल्यामुळे कामगारांनी भोसले यांच्याशी चर्चा केली. आमदारांनी शासन विरोधात उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी कामगारांना सहकार्य केले. न्यायालयाने सहा आठवडय़ांत या विषयावर निर्णय घेण्याचे आदेश दिले. कामगारमंत्र्यांनी निवृत्तीचे वय ५६ वरून ५८ करण्याचा आदेश काढण्यात आला, परंतु या आदेशाची अंमलबजावणी न करता व्यवस्थापनाने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल अजूनही लागलेला नाही.
दरम्यान, कामगार आयुक्तांनी स्थायी आदेशाच्या मुद्दय़ावर बैठका घेऊन सेवानिवृत्तीचे वय ५६ वरून ६० वर्षे करण्याचे आदेश २८ मे २०१४ रोजी दिले. त्यानंतर आ. भोसले यांच्या सहकार्याने ३१ मे २०१४ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या ५० कामगारांसाठी कामगार न्यायालयातून स्थगिती आदेश १२ जून २०१४ पर्यंत मिळविला. त्यानंतर त्या कामगारांना निवृत्त करण्यात आले. कंपनीतून आजपर्यंत ६९० कामगार निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीच्या मुद्दय़ाबाबत तसेच १८ महिने करार संपलेला असताना कराराबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी कामगार संघटनेतर्फे राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर उपाध्यक्ष दत्तात्रय वराडे, सरचिटणीस अरुण ठाकरे, खजिनदार लहू माळी आदींची स्वाक्षरी आहे.