तालुक्यातील निम्नपांझरा अक्कलपाडा प्रकल्पात यंदा १२०० दशलक्ष घनफुट जलसाठा आरक्षित करावयाचा असून त्यानंतर पांझरा नदीत वाहून जाणारे पाणी उजव्या कालव्याव्दारे नकाणे, हरण्यामाळ लघुप्रकल्प भरण्यासाठी वापरण्यात येईल. परंतु तत्पूर्वी उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी धुळे पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाला महापालिकेने तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी आ. प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.
यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पाण्याचे महत्त्व लोकांना समजू लागले आहे. महापालिकेच्या महासभेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने सर्वाची आशा अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्याकडे लागली आहे. अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी उजव्या कालव्याव्दारे हरण्यामाळ आणि नकाणे तलावात गेल्या वर्षी सोडण्यात आल्यामुळे आजही शहरातील ४० टक्के जनतेची तहान पांझरेच्या पाण्यावर भागवली जात आहे.
१५ दिवसांपूर्वी दुष्काळाची भीषणता वाढली असताना आ. प्रा. शरद पाटील यांनी धुळे पाटबंधारे विभाग व अक्कलपाडा धरणाशी संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. अक्कलपाडय़ात साचणारे पाणी उजव्या कालव्याव्दारे धुळे शहराला पाणी पुरविणाऱ्या नकाणे व हरण्यामाळ प्रकल्प भरून देण्यासाठी नियोजन करण्याकरिता ही बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अक्कलपाडय़ात पूर्णपणे १२०० दशलक्ष घनफुट जलसाठा निर्माण झाल्यानंतर सदर पाणी तत्काळ उजव्या कालव्याव्दारे धुळ्यासाठी वळविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. परंतु हे पाणी योग्य रीतीने   जाण्यासाठी   ३०    किलोमीटर लांबीच्या    या   कालव्याची साफसफाई, ठिकठिकाणी नादुरुस्त बांधकामे दुरुस्त करणे, यांची अंदाजपत्रके तत्काळ करण्याचे निर्देश आ. शरद पाटील यांनी दिले.
पालिका अभियंता कैलास शिंदे यांना सदर पाणी सोडताना पाण्याची नासाडी टाळण्यासाठी देखरेखीकरता पालिकेचे कर्मचारी व दुरुस्ती आवश्यक तो अंदाजपत्रकातील निधी धुळे पाटबंधारे विभागाकडे तत्काळ वर्ग करण्याचे मान्य केले. सदर पाण्याची नासाडी टाळण्यासाठी हा निधी आवश्यक असल्याचे आमदारांनी सांगितले.