जिल्हा उपनिबंधक सतीश क्षीरसागर व पणन अधिकारी आर. व्ही. चव्हाण यांना चाबकाने मारहाण केल्याप्रकरणी ‘आप’च्या दोन कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, राज्यातील जिल्हा उपनिबंधक व तालुका निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या मारहाणीचा निषेध करून लेखणीबंद आंदोलन सुरू केले. शुक्रवारी (दि. २८) जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील खरेदी-विक्री व्यवहार बंद राहणार आहेत.
शासकीय खरेदी केंद्रावर आणलेला माल आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी करावा, या साठी रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या व ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे वखार महामंडळ गोदामात गोंधळ घातला. यावेळी क्षीरसागर, चव्हाण व केंद्रप्रमुख मारमवार यांना चाबकाने मारण्यात आले. या प्रकरणात अमृत िशदे यांच्यासह १५जणांवर कोतवाली पोलिसांत मारहाण व दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला. बुधवारी या गुन्ह्यात ‘आप’चे कार्यकत्रे भानुदास िशदे (नरसापूर) व अर्जुन साबळे (भोगाव) या दोघांना अटक झाली.
दरम्यान, मारहाणीच्या निषेधार्थ जिल्हा उपनिबंधक व तालुका निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करावी व कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, या मागण्या मान्य होईपर्यंत लेखणीबंद आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष पी. एम. सवंडकर, पी. टी. घुगे, मुकुंद देशमुख यांनी दिला. शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील खरेदी-विक्री व्यवहार बंद राहणार असल्याचे सर्व सचिवांच्या सहीने कळविण्यात आले आहे.