राजकारण म्हणजे सारा मतलबाचा मामला, तेथे उच्च विद्याविभूषित, प्रामाणिक आणि सरळमार्गी मंडळींना स्थान नाही. असे मानले जाण्याच्या काळात, बडय़ा विदेशी बँकेचे भारतातील प्रमुखपद त्यागून मीरा संन्याल सक्रिय राजकारणात उतरल्या, निवडणुका लढविल्या आणि काहीशा आशा जागविल्या असतानाच दुर्धर आजाराने त्यांना आपल्यापासून हिरावूनही नेले. त्यांच्या जाण्याने विद्यमान राजकीय व्यवस्थेतील एक बुद्धिमान, निर्मळ आणि मनोहारी व्यक्तित्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

कोची येथे जन्मलेल्या संन्याल यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले. मुंबईची संस्कृती, तिचे चतन्य आणि आत्मा याच्याशी त्या समरसून गेल्या होत्या. या ‘मुंबईपणा’ला बाधा आणणारी कोणतीही गोष्ट त्यांना साहवत नव्हती. ‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने त्या अशाच व्यथित झाल्या आणि त्यांना हव्या असलेल्या राजकीय-सामाजिक व्यवस्थेसाठी स्वत:च राजकारणात सक्रिय होण्याचा मार्ग त्यांनी निवडला. उच्चभ्रूंमधील काही हळव्या रिकामटेकडय़ांसह मेणबत्त्या लावून देश सुधारत नसतो, अशा हेटाळणीलाही त्यांना सामोरे जावे लागले. त्याला उत्तर म्हणून २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज करून त्यांनी साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. निवडणुकीत त्यांचा निभाव लागणार नाही, हे जाणवत असतानाही राजकारणाचा तोंडवळा बदलण्याची ही सुरुवात असल्याचे ठरवून नियमित पदयात्रा, लोकांच्या भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वाटप त्यांनी नेटाने केले. पुढे अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सक्रियता आणि त्याचा इतरांबाबतही अनुभवास आलेला सयुक्तिक परिणाम म्हणजे आम आदमी पक्षात त्या सक्रिय झाल्या.

तीन दशकांच्या बँकिंग क्षेत्रातील कारकीर्दीत एबीएन अ‍ॅमरो बँकेच्या आशिया विभागाच्या प्रभारी पदापासून ते रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडचे भारतातील मुख्याधिकारीपद मीरा संन्याल यांच्याकडे होते. उद्योग संघटना, नियामकांच्या विविध समित्यांमध्ये कार्यरत राहून त्यांनी योगदानही दिले. शिवाय त्या कार्यरत असलेल्या बँकांच्या सामाजिक दायित्व उपक्रमांचेही नेतृत्व करताना समाजासाठी काही दूरगामी परिणाम साधणारे प्रकल्प त्यांनी राबविले. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय ऊर्मी ही लहर येऊन अकस्मात जागी झालेली नव्हती; तर समाजकारण, सार्वजनिक जीवनातील सक्रियतेतून आलेली ती सहज प्रेरणा होती. आपल्यासारख्या अनेकांनीही हा मार्ग निवडल्यास राजकारणाची झालेली गटारगंगा स्वच्छ करता येईल, अशी त्यांची धारणा आणि प्रयत्नही होता. निश्चलनीकरणाचा निर्णय म्हणजे ‘घोर अनर्थच’ असे सडेतोड सांगणारे ‘द बिग रीव्हर्स’ हे पुस्तक कर्करोगाशी त्यांचा झगडा सुरू असतानाच त्यांनी लिहिले आणि नोव्हेंबरमध्ये ते प्रकाशित झाले. काळ बनून आलेले गंभीर आजारपण त्यांचा एक एक दिवस हिरावून नेत होते, पण त्यापोटी निराशेचा कोणताही लवलेश त्यांच्या समाजमाध्यमांवरील टिप्पणीत नसे. बहारदार नववर्षांच्या शुभेच्छेच्या शेवटच्या ट्वीटनेच त्यांनी समाजमाध्यमांचा आणि या जगाचाही निरोप घेतला.