भारताच्या वैज्ञानिक जगतात अणुऊर्जा आयोगाचे स्थान अनन्यसाधारण असून डॉ. अनिल काकोडकर, डॉ. शेखर बसू यांच्यासारख्या अनेक नामवंत वैज्ञानिकांनी या आयोगाचे अध्यक्षपद भूषवले आहे. आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्राचे संचालक डॉ. कमलेश नीलकंठ व्यास यांची या आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून अलीकडेच त्यांनी आपला पदभार स्वीकारला. आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच अणुऊर्जा विभागाचे सचिवपदही त्यांच्याचकडे असेल. बडोद्याचे रहिवासी असलेले कमलेश व्यास हे शालेय जीवनापासूनच अतिशय बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जात. १९५७ मध्ये जन्मलेल्या व्यास यांना अभियंता होऊन परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवणे अवघड नव्हते. बडोदा येथीलच एम एस विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी त्यांनी विशेष प्रावीण्यासह मिळवली. पदवी प्राप्त केल्यानंतर ते भाभा अणुशक्ती केंद्राच्या प्रशिक्षण विद्यालयात आले. तेथील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर १९७९ मध्ये ते अणुभट्टी विभागात रुजू झाले. याच विभागातील इंधन आरेखन आणि विकास या क्षेत्रात त्यांना विशेष रस असल्याने तेथे त्यांना आपली प्रतिभा आणि कौशल्य सिद्ध करता आले. अणुभौतिकी हा त्यांचा आवडता विषय असल्याने अणुभट्टय़ांसाठी लागणाऱ्या इंधनावर त्यांनी दीर्घ काळ संशोधन केले. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल शासन तसेच विविध संस्थांनी घेतली. २०११ मध्ये न्यूक्लिअर सोसायटीचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याआधी २००६ ते २०१३ या कालावधीत पाच वेळा ते होमी भाभा औद्योगिक पुरस्काराचे मानकरी ठरले होते. इंडियन नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिनीयर्सचे ते फेलोही आहेत. व्यास आणि शेखर बसू हे व्हिएन्ना येथे अणुऊर्जाविषयक परिषदेसाठी गेले असतानाच त्यांना या नव्या नियुक्तीसंबंधी कळवण्यात आले. वयाची ६४ वर्षे पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच २०२१ पर्यंत ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष राहतील. अणुशास्त्रज्ञांना संशोधनासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या आयोगावर असल्याने ही नियुक्ती महत्त्वाची आणि तितकीच संवेदनशील मानली जाते. व्यास यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे काम अधिक वेगाने चालेल, अशी अपेक्षा आहे.