आंतरराष्ट्रीय कृषिवैज्ञानिक असलेले डॉ. राजीव वाष्र्णेय यांचा जनुकीय पिकांच्या संशोधनातील अनुभव वीस वर्षांहून अधिक आहे. अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या संशोधनाला मोठे महत्त्व असून अलीकडेच त्यांना चीनचा ‘क्विलू मैत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांनी शेंगदाण्याच्या पिकाचा जनुकीय आराखडा तयार करण्यात मोठे काम केले आहे. शांगडाँग पीनट रिसर्च इन्स्टिटय़ूट व शांगडाँग अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस या संस्थांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. परदेशी तज्ज्ञांना दिला जाणारा ‘क्विलू मैत्री पुरस्कार’ हा सर्वात मोठा मानला जातो.

‘इक्रिसॅट’ या लघुनामानेच ओळखल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल क्रॉप्स रीसर्च इन्स्टिटय़ूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स’ या संस्थेत वाष्र्णेय हे गेली ११ वर्षे कार्यरत असून सध्या जेनेटिक गेन्स या आंतरराष्ट्रीय संशोधन विभागाचे प्रकल्प संचालक आहेत. शेंगदाण्याच्या लागवडीसाठी नवीन पद्धत विकसित करण्यासाठी त्यांनी चीनमधील अनेक संस्थांच्या सहकार्याने या पिकाचा जनुकीय आराखडा तयार करण्यात मोठे काम केले आहे. यात जिओकार्पी, तेलाचे जैवविश्लेषण व शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी या बाबींचा विचार करण्यात आला. शेंगदाण्याचा जनुकीय आराखडा उलगडणे हे सर्वात कठीण काम असते, ते वाष्र्णेय व त्यांच्या चमूने केले आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पात त्यांनी काम केले आहे. कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या पिकांबाबत त्यांचे संशोधन आहे. चवळी, ज्वारी या पिकांबाबतही त्यांचे जनुकीय संशोधन महत्त्वाच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे. ‘इक्रिसॅट’च्या ग्रेन लेज्युम्स तसेच उपयोजित जनुकशास्त्र प्रकल्पात काम करीत होते. २००५ ते २००८ या काळात त्यांनी वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम केले. या संस्थेतील सेंटर फॉर एक्सलन्स इन जिनॉमिक्स या विभागाचे ते संस्थापक संचालक आहेत. डाळी व कडधान्ये यांच्या पीक पद्धतीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी जनुकीय साधनांचा वापर केला आहे.

अलिगड विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात बीएस्सी, त्याच विषयात एमएस्सी अशा शिक्षणानंतर डॉ. वाष्र्णेय मेरठ येथे चरण सिंग विद्यापीठात प्रा. पी. के. गुप्ता यांच्या प्रयोगशाळेत प्राध्यापक होते, नंतर त्यांनी गव्हाच्या जैवतंत्रज्ञानावर पीएच.डी. केली. जर्मनीतील विसेन्शाफ्लिशर या वैज्ञानिकासमवेत त्यांनी वनस्पतींचे जनुकशास्त्र व पीक संशोधनावर काम केले. २००५ मध्ये ते आयसीआरआयसॅटमध्ये अ‍ॅप्लाइड जिनॉमिक्स विभागात  रुजू झाले. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे बाहजोई येथे त्यांचा जन्म झाला व शिक्षण अलिगड व मीरत येथे झाले. सुरुवातीपासूनच त्यांची ओढ कृषी क्षेत्राकडे होती. जनुकशास्त्रीय पीक  सुधारणा, रेणवीय लागवड पद्धतीत जनुकीय आराखडे तयार करणे, जेनिक मायक्रोसॅटेलाइट मार्कर्स या विषयात त्यांनी संशोधन केले. त्यांना यापूर्वी सीएसआयआरचा शांतिस्वरू प भटनागर पुरस्कारही मिळाला आहे.