बातमी काढणे हे बातमीदाराचे काम असते, तर कोणती बातमी बातमीदारापर्यंत पोहोचवायची आणि कोणती बातमी पोहोचू द्यायची नाही हे जनसंपर्क क्षेत्रातील लोकांचे काम असते. त्यातूनही, महत्त्वाच्या व्यक्तीच्या किंवा कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याची ही मोठी जबाबदारीच असते. ती जबाबदारी वर्षांनुवर्षे चोखपणे पार पाडली म्हणूनच चौदा वर्षांपूर्वीच्या निवृत्तीनंतरही जगदीशभाई ठक्कर हे नाव गुजरात आणि दिल्लीच्या सरकारी कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या प्रत्येकास माहीत झाले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्याआधीच्या जवळपास डझनभर मुख्यमंत्र्यांच्या विश्वासास जनसंपर्क अधिकारी म्हणून पात्र ठरलेले जगदीशभाई ठक्कर नंतर नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतही त्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करू लागले.

सरकारच्या स्तरावरील उच्च पदावरील नेता आणि त्याच्या कार्यालयाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहणारी व्यक्ती यांचे नाते नोकरीपलीकडचे असले, तर माध्यमांपासून कोणत्या वेळी किती अंतर राखावयाचे याचे भान त्या जनसंपर्क अधिकाऱ्यास येते. जगदीशभाईंशी संपर्क साधता येत नाही अशी तक्रार  माध्यम प्रतिनिधींकडून अधूनमधून होत असे. पंतप्रधान कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते किती सक्षमपणे काम करत होते, हेच अशा तक्रारींवरून सूचित होत होते. असे असले, तरी माध्यमांच्या प्रतिनिधींशी जगदीशभाईंचे स्नेहाचे संबंध होते. जनसंपर्क आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी संचार केलेला असल्याने, पत्रकाराची गरज आणि जनसंपर्क अधिकाऱ्याच्या मर्यादा या दोन्ही बाबींची त्यांना  जाण होती. मोदी पंतप्रधान झाल्यावर जगदीशभाई हे पंतप्रधान कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून अनामपणे काम करू शकले, याचे कारणही बहुधा हेच असावे.

१९७० च्या दरम्यान जगदीशभाई ठक्कर हे पत्रकारितेतून गुजरात सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या सेवेत दाखल झाले आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अमरसिंह चौधरी, माधवसिंह सोलंकी, चिमणभाई पटेल, छबिलदास मेहता, केशुभाई पटेल, सुरेश मेहता, शंकरसिंह वाघेला, दिलीप पारिख आणि नरेंद्र मोदी एवढे मुख्यमंत्री जगदीशभाईंनी आपल्या कारकीर्दीत पाहिले. गेल्या ९ डिसेंबर रोजी जगदीशभाईंचे वयाच्या ७२ व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले. पंतप्रधान कार्यालयाची ओळख असलेला प्रत्येक जण जगदीशभाईंच्या निधनाने हळहळला.. जनसंपर्क क्षेत्राचा आदर्श म्हणून त्यांची ओळख त्या क्षेत्रास कायम राहील.