भारतातील ‘गहू क्रांती’चे जनक आणि हरित क्रांतीचा पाया रचणारे कृषी वैज्ञानिक डॉ. दिलबाग सिंग अठवाल यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. भारतातील अन्नधान्य उत्पादनात वाढ अत्यावश्यक असताना डॉ. अठवाल यांनी ‘बाजरा-१’ या बाजरीच्या वाणाचा आणि ‘कल्याण’ व ‘कल्याणसोना’ या गव्हाच्या वाणांचा शोध लावला. त्यामुळे १९६०-६१ या वर्षांच्या तुलनेत भारतात १९७०-७१ या वर्षी तीन पटींनी गव्हाचे उत्पादन वाढले. त्यामुळेच डॉ. दिलबाग सिंग अठवाल यांच्या कृषी संशोधनातील देदीप्यमान कारकीर्दीचा आढावा घेणे आवश्यक ठरते. डॉ.अठवाल यांचा जन्म १९२८ मध्ये पंजाबमधील कल्याण या गावात झाला. पंजाब कृषी विद्यापीठात ते प्राध्यापक आणि संकरित वाण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. नॉर्मन बोरलॉग यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि हरित क्रांतीनंतर भारतात ‘संकरित वाण क्षेत्रातील जादूगार’ अशी अठवाल यांची ओळख निर्माण झाली. ७० च्या दशकात भारताने मेक्सिकोवरून ‘लेरमा रोजो ६४’ आणि ‘पीव्ही १८’ या गव्हाच्या वाणांची आयात केली. या वाणांचे उत्पादन भरघोस येत असले तरी पोळ्यांचा रंग लाल असल्यामुळे त्यात बदलाची गरज निर्माण झाली. देशातील कोटय़वधी जनतेची अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादनाची आवश्यकता असताना अठवाल यांनी प्रदीर्घ संशोधन करून या वाणांचा रंग बदलण्यात यश मिळविले. गव्हाचा बदललेला रंग म्हणजे अठवाल यांनी भारताला दिलेली अनोखी भेटच ठरली. बदललेल्या या वाणाला त्यांनी आपल्या गावाच्या नावावरून ‘कल्याण’ असे नाव दिले. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली येथे ‘सोना’ या भारतीय वाणाचा शोध लावण्यात आला. त्यानंतर अठवाल यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेतील संशोधकांसह ‘कल्याण’ आणि ‘सोना’ या दोन्ही वाणांचे एकत्रीकरण करून ‘कल्याणसोना’ हा नवा वाण विकसित केला. १९६०-६१ मध्ये भारतातील गहू उत्पादन १२.४४ क्विंटल प्रतिहेक्टर होते. ‘कल्याण’ वाणामुळे १९७०-७१ मध्ये गहू उत्पादन २२.३७ क्विंटल प्रतिहेक्टपर्यंत वाढले. या वाणांमुळे भारत गहू उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. डॉ. अठवाल यांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी लावलेला संकरित बाजरीचा शोध. त्यांनी विकसित केलेल्या बाजरीच्या या संकरित वाणामुळे देशातील बाजरीचे उत्पादन दुपटीने वाढले. त्यामुळे भारतातील अन्नधान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत झाली. पंजाब कृषी विद्यापीठाच्या वनस्पती प्रजनन विभागाचे संस्थापक विभागप्रमुख असलेल्या डॉ. अठवाल यांनी गहू, बाजरी, हरभरा आणि तंबाखू या पिकांच्या विविध वाणांच्या निर्मितीत बहुमूल्य योगदान दिले आहे. बाजरीच्या संकरित वाणांच्या विकासात आणि संशोधनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. १९६७ मध्ये अठवाल फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत उपमहासंचालक म्हणून रुजू झाले. तेथेही त्यांनी भाताच्या नव्या वाणाच्या संशोधनासाठी नवनवीन कल्पना सादर केल्या. सिडनी विद्यापीठाने १९५५ मध्ये डॉ. अठवाल यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविले. कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या संशोधनासाठी भारतातील विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार अठवाल यांना १९६४ मध्ये देण्यात आला. जैविक विज्ञानातील कामगिरीसाठी त्यांना १९७५ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण या नागरी पुरस्काराने गौरविले होते. हरित क्रांतीला ‘गहू क्रांती’ असे म्हणून हिणवण्याचा सूर अनेक जण लावतात, परंतु ‘गहू क्रांती’मागे निर्विवादपणे अठवाल यांचे कर्तृत्व होते. कृषी क्षेत्रातील संशोधनामुळे जागतिक पातळीवर ठसा उमटविणाऱ्या आणि अन्नधान्य उत्पादनात भारताला स्वयंपूर्णतेकडे नेण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अठवाल यांच्यासारखे भारतीय आजच्या ‘जीएम’काळात विरळाच आहेत.