‘मुक्ता फिल्म्स’ ही कंपनी त्यांनी तमिळनाडूत स्थापली आणि खरोखरच, मुक्त विचारांचे वारे आपल्या देशात चित्रपट- संगीत आदी कलांद्वारे रुजवणाऱ्या १९६०च्या दशकातील ‘चळवळी’चे ते पाईक ठरले. सन १९५७ पासून पुढली साठ वर्षे ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. आणि लोकप्रियता इतकी की, व्यंकटचारी श्रीनिवासन हे त्यांचे खरे नाव मागेच पडून ते ‘मुक्ता श्रीनिवासन’ म्हणूनच ओळखले गेले. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याची वार्ता बुधवारी आली, तेव्हा हिंदीचे प्रेक्षक निर्विकार राहिले तरी ‘दयावान’ हा हिंदी चित्रपट ज्याची अनुवादित आवृत्ती (डब्ड व्हर्जन) होता, त्या ‘नायकन्’ या मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटाचे निर्माते होते मुक्ता श्रीनिवासन!

हा ‘नायकन्’ १९८७ सालचा. त्याच्या ३० वर्षांआधी- १९५७ सालात स्वत: श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुधलळ्ळी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ठरला होता. त्याहीआधीची मोजून दहा वर्षे श्रीनिवासन यांनी तमिळ चित्रसृष्टीत उमेदवारी केली. पुढे मुख्यमंत्री झालेल्या एम. करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन या दोघाही तत्कालीन अभिनेत्यांच्या संवाद-तालमी श्रीनिवासन यांनी घेतल्या होत्या. भाऊ व्ही. रामस्वामी यांच्या ओळखीने चित्रपट क्षेत्रात आलेल्या श्रीनिवासन यांचा मूळ पिंड लेखकाचा. पण चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली ती १९८४ पासून. त्याआधी सरळ कथा-कादंबऱ्या, ललित निबंध असे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले ते फार तर छंद म्हणून. पण पन्नाशीनंतर या छंदास त्यांनी अधिक वेळ दिला.

जयललितांसह अनेक प्रख्यात अभिनेत्री/ अभिनेते त्यांच्या दिग्दर्शनातून झळकले. मात्र अभिनेते जेमिनी गणेशन यांची सामाजिक चित्रपटांमधील अभिनेता म्हणून कारकीर्द घडली, ती श्रीनिवासन यांच्यामुळे. एरवी गणेशन हेही एमजीआर, करुणानिधी यांच्याप्रमाणे १९५०च्या दशकातील कल्पितकथांच्या चित्रपटांतच अडकू लागले असताना श्रीनिवासन यांनी गणेशन यांना आठ चित्रपटांचे नायक केले. त्यापैकी चार चित्रपट तर विनोदी अंगाचे होते. उग्र अभिनयाची दाक्षिणात्य शैली बदलण्यासही १९६५ नंतरचा हाच काळ, त्यातील श्रीनिवासन यांचे चित्रपट कारणीभूत ठरले. अभिनयाची शैली इतकी बदलली की पुढे ऐंशीच्या दशकात मुंबईतील तत्कालीन ‘भाई’ वरदराजन मुदलियार यांच्यावर बेतलेला नायकन् साकारताना कमल हासनच्या कानावरील नस हलली आणि प्रेक्षक समजून गेले.. ‘राडा’ होणार आता!

पन्नास चित्रपटांपैकी २९ ‘सुपरहिट’, पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नाला राष्ट्रीय पुरस्कार, ९० हून अधिक कथासंग्रह, इंग्रजीत आलेल्या पुस्तकांसह एकंदर २५० पुस्तकांवर लेखक म्हणून नाममुद्रा.. असे कर्ते समाधान मिळवून श्रीनिवासन निवर्तले.