तमिळसारख्या जुना वारसा असलेल्या भाषेतून साठच्या दशकात प्रभावी लेखन करणाऱ्यांत एस. वैद्यलिंगम यांचा समावेश होता. प्रभंजन या टोपणनावाने त्यांनी केलेले लेखन लोकप्रिय ठरले. साहित्याच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करतानाच त्यांनी समीक्षक म्हणून तेवढीच साक्षेपी भूमिका पार पाडली. त्यांच्या निधनाने तमिळ भाषेतील एक मोलाचा दुवा निखळला आहे.

ते तमिळ भाषेतून लेखन करीत असले तरी मूळ पुडुचेरीचे होते. तेथेच त्यांचा जन्म झाला. पेटिट सेमीनेर हायर सेकंडरी स्कूल या शाळेतून त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे बालपणीचे नाव वैद्यलिंगम. त्यांचे वडील ताडीचे दुकान चालवीत. वैद्यलिंगम यांनी करानधाई महाविद्यालयातून तमिळ भाषेत एमए केले. नंतर त्यांनी तंजावर येथे तमिळ भाषेचे अध्यापन सुरू केले. ‘कुमुदम’, ‘आनंद विकटन’ व ‘कुंगुमम’ या साहित्यविषयक नियतकालिकांत त्यांनी पत्रकारिता केली. त्यांची पहिली लघुकथा ‘एन्ना उलगमाडा’ ही ‘भारणी’ या नियतकालिकातून प्रसिद्ध झाली. एकूण तीनशेहून अधिक कथा त्यांनी साकारल्या. त्यानंतर आत्मसन्मान चळवळीच्या प्रभावाखाली ते आले. त्यांची एकूण ४६ पुस्तके प्रसिद्ध आहेत. १९९५ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार ‘वनम वसपादम’ (द स्काय विल बी अवर्स) या त्यांच्या कादंबरीसाठी मिळाला. ही कादंबरी आनंद रंगा पिल्ले यांच्या काळावर बेतलेली आहे. तिचे हिंदी, तेलुगु, कन्नड, जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, स्वीडिश अशा अनेक भाषांत रूपांतर झाले आहे. ‘मुटाई’ हे त्यांचे नाटक दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून ‘नेत्रू मनिधारगल’ हा लघुकथासंग्रह अनेक महाविद्यालयांत अभ्यासासाठी आहे. दुर्दैवाने त्यांना फुप्फुसाचा कर्करोग झाला होता, पण अखेपर्यंत त्यांनी त्याच्याशी झुंज दिली. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ‘वनम वसापदम’, ‘महानधी’, ‘मनुदम वेलुम’, ‘संध्या’, ‘कागिधा मनीधारगल’, ‘कनीरल कप्पोम’, ‘पेनमाई वेल्गा’, ‘पढावी’, ‘इरोडू थमिझार उयीरोडू’ यांचा समावेश होता. लघुकादंबऱ्यांत ‘अनगलम पेंगालम’ समाविष्ट असून लघुकथासंग्रहात ‘नीरू मनीधारगल’, ‘विट्टू विद्युतलायगी’, ‘इरूटीन वासल’, ‘ओरी ओरिल इरांडू’, ‘मनीधारगल’ या कलाकृती लक्षणीय ठरल्या. नाटय़ क्षेत्रातही मुशाफिरी करताना त्यांनी ‘मुटाई’ व ‘अक ल्या’ ही दोन नाटके लिहिली.

साहित्य अकादमी पुरस्कार, भारतीय भाषा परिषद पुरस्कार, कोईमतूर कस्तुरी रंगामल पुरस्कार, इलकिया चिंतनाई पुरस्कार, अदिथनर व दी तमिळ लिटररी गार्डन पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या साहित्यावर द्रविडी चळवळीचा प्रभाव होता. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचा दृष्टिकोनही त्यातून नेहमीच डोकावताना दिसतो.

तमिळ दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही त्यांनी मोठे योगदान दिले होते. जवळपास चाळीस वर्षे त्यांनी साहित्य क्षेत्र गाजवले. पीएमके पक्षाचे संस्थापक रामदोस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते व त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही होत असत. असे असले तरी त्यांनी राजकारण व साहित्य यांची कधी गल्लत केली नाही. त्यांच्या वेगळ्या शैलीने तमिळ साहित्यावर मोहिनी घातली होती ती यापुढेही कायम राहील यात शंका नाही.