भारताच्या ऐतिहासिक पाचशेव्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे कसोटीमध्ये दोनशे बळी पूर्ण होणे, हा भारतीय चाहत्यांसाठी सुवर्णयोगच. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोनशे बळी मिळवणारा तो पहिला भारतीय व क्रिकेटविश्वातील दुसरा खेळाडू ठरला आहे. भारताने २०११ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हाच्या संघातील पंधरा सदस्यांत तोही होता. त्या वेळी हरभजन सिंगला चांगली कामगिरी करता येत नव्हती आणि अश्विनला संघात स्थान द्यायला हवे, अशी चर्चा सुरू होती; पण विश्वचषकातील फक्त दोन सामने त्याच्या पदरात पडले. पण विश्वचषकानंतर मात्र अश्विनला चांगली संधी मिळाली. अश्विनने त्यानंतर केलेल्या दमदार कामगिरीमुळे तो संघाचा कायम सदस्यही झाला. आयपीएलमध्ये तर अश्विनची कामगिरी नेहमीच चांगली झालेली आहे. अश्विन म्हणजे धोनीचा सर्वात विश्वासू गोलंदाज; पण दुसरीकडे अश्विन धोनीच्या खोगीरभरतीमधला खेळाडू कधीच वाटला नाही, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अश्विन गोलंदाजीचा विचार करतो. अन्य गोलंदाजांपेक्षा तो कधीच कोणावर अवलंबून राहिलेला दिसत नाही. शांत, सुस्वभावी, कोणत्याही वाईट गोष्टीपासून दूर राहणारा संस्कारी खेळाडू, अशी अश्विनची प्रतिमा आहे. कनिष्ठ दर्जाच्या क्रिकेटमध्ये अश्विन सलामीला यायचा. त्यामुळेच संघ जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा अश्विन बऱ्याचदा खेळपट्टीवर उभा राहताना आपण पाहिले आहे. इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीतील त्याची गोलंदाजी चिरंतन अशीच. २०१० साली आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना अश्विन नावारूपाला आला. धोनीसारखा कर्णधार त्याला मिळाला आणि अश्विनने आपल्या गुणवत्तेचे सोने केले. अश्विनच्याही काही गोष्टी दर्दी क्रिकेटचाहत्याला खटकतात. ऑफ स्पिनरने ऑफ स्टम्पवर किंवा त्याच्या बाहेर चेंडू ठेवायला हवा, हे साधे गणित आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये बळी कमावायचे तर चेंडूला चांगली उंची देणे उचित ठरते. अश्विन ते करताना दिसत नाही. तो ऑफ स्पिनर असून चेंडू लेग स्टम्पवर टाकतो, ही नकारात्मक गोलंदाजी झाली. असे अश्विनकडून बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करायची एक मानसिकता असते, ती त्याच्याकडे दिसत नाही. तो बळी मिळवतो ही चांगली गोष्ट आहेच, पण त्याच्या गोलंदाजीतली नजाकत हरवली आहे. अश्विनच्या बळींवर नजर टाकली तर त्याचे जास्त बळी हे भारताच्या फिरकी आखाडय़ातले आहेत. परदेशात त्याला हवे तसे यश मिळवता आलेले नाही, हीदेखील बाब लक्षात घेण्यासारखी. ‘३७ कसोटय़ांत २०० बळी’ ही घटना अश्विनचे अभिनंदन करण्यासारखीच आहे; पण आणखी बराच मोठा पल्ला त्याला गाठायचा आहे. प्रत्येक सामन्यामधून शिकण्यासारखे असते, असे म्हटले जाते. अश्विन काही गोष्टी नक्कीच शिकेल, अशी आशा आपण या वेळी व्यक्त करायला हवी.