देशात स्वातंत्र्यासाठी संघर्ष चालू असतानाच्या काळात तरक्कीपसंद म्हणजेच सुधारणावादी लेखकांचा संघही आपले विचार आणि लिखाणाच्या माध्यमातून या संघर्षांला पूरक असेच काम करीत होता. या पुरोगामी साहित्य चळवळीतून अनेक चांगल्या कादंबऱ्या व कविता तर लिहिल्या गेल्याच, शिवाय त्यातून उर्दू साहित्यात नवे प्रवाह आले. डाव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या या गटातून सआदत हसन मण्टो, इस्मत चुगताई, मुन्शी प्रेमचंद, कैफी आझमी अशी नामवंत लेखक-कवींची फळीच यातून तयार झाली. याच चळवळीत होत्या सलमा सिद्दिकीही! प्रभावी, बोलके डोळे आणि रोमन नाक यामुळे त्यांचा चेहराही विलक्षण भासे. त्या बोलू लागल्या की त्यांच्या भाषेतील उर्दूची नजाकत आणि खानदानी तेहजीबही जाणवत असे. बोलताना मध्येच त्या कोटय़ा करून ऐकणाऱ्याला खळाळून हसवत. आप्त आणि मित्रपरिवारासाठी त्या होत्या सलमाआपा. हजरजबाबीपणा व अन्य गुण त्यांनी वडिलांकडून घेतले होते. कॅथॉलिक अलिगडची त्यांच्यावर छाप होती, पण तरी त्या जीवनाकडे वैश्विक दृष्टिकोनातून बघत असत. अलिगडला त्यांचे जे घर होते ते एखाद्या ब्लँडिंग कॅसलसारखे. गुलाबाची रोपे. नक्षीदार लॉन, मोठमोठी झाडे. ऐसपैस व्हरांडा. दुपारी तेथेच पै-पाहुण्यांसमवेत चहाचा आस्वाद व गप्पांचा फड जमत असे. यामध्ये कधी डॉ. झाकीर हुसेन तर कधी ई. एम. फोस्टर यांच्यासारख्या बडय़ा असामीही असत. अलिगडच्या वातावरणात सलमाआपांची प्रतिभा फुलली. त्यातूनच ‘सिकंदरनामा’ हे पुस्तक त्यांनी चित्रशैलीत साकारले. सिकंदराच्या साहसी कथांचा हा संग्रह आहे. सलमाआपांचा जन्म बनारसजवळील एका गावात १९३० मध्ये झाला. अलिगड येथे त्यांनी उर्दू साहित्यात एम.ए. केले. काही काळ तेथील महिला महाविद्यालयात अध्यापन केले. त्यांचा पहिला विवाह अल्पकाळ टिकला. मग त्या उर्दूतील पुरोगामी लेखक कृष्ण चंदर यांच्या संपर्कात आल्या व १९५७ मध्ये त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. मुंबईत आल्यानंतर त्यांची प्रतिभा आणखी फुलली. मुंबई व देशाच्या उर्दू साहित्यवर्तुळात त्यांचा दबदबा होता. त्यांचे पती काहीसे शांत होते, तर आपांचा स्वभाव मात्र फेसाळत्या शँपेनसारखा होता. अलिगडमध्ये वाढलेल्या सलमाआपांना उर्दूतील लयकारी मिळाली नसती तरच नवल. १९७७ मध्ये त्यांचे पती कृष्ण चंदर यांचे निधन झाले. सलमाआपा नंतर एकटय़ाच राहत होत्या. त्यांचा उर्दू साहित्याचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्यात खूप काही लिहिण्याची क्षमता होती, तरी त्यांनी फारसे लिखाण केलेच नाही. त्यांचा गप्पांचा शौक वेगळाच होता. उर्दू भाषेची स्थिती, अलिगडचे दिवस हे त्या मैफलीतील खास विषय. अलिगडने त्यांनाच नव्हे, तर त्यांच्या एका सगळ्या पिढीला घडवले होते. त्यात चित्रपट निर्माते, कवी, लेखक, पत्रकार होते. त्यांचाही प्रवास अलिगड ते मुंबई असाच झाला होता. त्यात इस्मत चुगताई, जाँ निसार अख्तर, मजरुह सुल्तानपुरी, के.ए. अब्बास असे अनेक सहप्रवासी होते. आपा यांच्या निधनाने बॉम्बे प्रोग्रेसिव्हचा अखेरचा दुवा निखळला आहे. आता आठवणींच्या त्या फडात आपल्याला घेऊन जाणारे कुणीच उरले नाही.