आलिशान गाडय़ांच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या मर्सिडीज बेन्झने आपल्या ‘एस-क्लास’ या ‘कनोस्युअर्स एडिशन’ या आलिशान गाडीचे नुकतेच अनावरण केले. मर्सिडीजचे यंदाच्या वर्षांतील हे चौथे अनावरण आहे. ‘जगातील सर्वोत्तम कार’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ‘एस-क्लास’चे भारतात उत्पादन हा मर्सिडीजच्या भारतातील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. सौंदर्य, दिमाखदारपणा आणि ऑटोमोटिव्ह सर्वोत्तमता यांचा सुंदर मिलाफ ‘एस-क्लास’मध्ये आहे. ‘एस-क्लास’च्या कनोस्युअर्स आवृत्तीचे अनावरण मर्सिडीज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड फॉल्गर यांच्या हस्ते झाले. कनोस्युअर्स आवृत्तीतील ए-३५० या मॉडेलची किंमत एक कोटी २१ लाख रुपये तर एस-४०० या मॉडेलची किंमत एक कोटी ३२ लाख रुपये आहे. ‘बीएस-४’ इंधन वितरणाला सुरुवात नवी दिल्ली : गेल्याच आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रदूषणकारी ‘भारत स्टेज ३’ वाहनांना बंदी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम मुदतीआधी आपल्याकडील गाडय़ांचा स्टॉक संपावा म्हणून दुचाकी निर्मात्यांनी दिलेल्या आकर्षक सवलतींचा लाभही ग्राहकांनी घेतला. त्यानुसार तब्बल साडेसहा लाख दुचाकींची विक्रमी विक्रीही देशभरात झाली. आता १ एप्रिलपासून नव्या ‘भारत स्टेज ४’ (बीएस-४) इंधन वितरणाला सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवडय़ात केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान यांनी या नव्या आणि कमी प्रदूषणकारी इंधन वितरणाचे उद्घाटन केले. देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हे इंधन उपलब्ध असून नागपूर, दुर्गापूर, इम्फाळ, रांची, गोरखपूर, मदुराई, गुवाहाटी यांसारखी शहरे आणि छोटय़ा शहरांमध्येही ‘बीएस-४’ इंधन उपलब्ध आहे. देशातील इंधनाच्या गुणवत्तेत आवश्यक बदल करून ते ‘बीएस-४’ मध्ये परावर्तित करून ते सर्वत्र उपलब्ध व्हावे या उद्देशाने देशांतर्गत तेलउत्पादक कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात मोहीम हाती घेतली आहे. ‘बीएस-४’ इंधनाचे वितरण देशभर व्हावे यासाठी देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्या विभागवार इंधन वितरण केंद्रांचे अद्ययावतीकरण करत असून त्यासाठी आतापर्यंत ९० हजार कोटी रुपये खर्च आला आहे. ‘बीएस-४’ दर्जाच्या इंधनाचा वापर करण्याला आपल्याला अंमळ उशीरच झाला आहे. वस्तुत या इंधनाच्या वापराविषयीची मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे फायदे आदींचा ऊहापोह २०१० मध्येच झाला होता. आणि देशातील १३ शहरांमध्ये या प्रकारचे इंधन वापरण्याचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आखून देण्यात आले होते. तसेच १ एप्रिल २०१७ पासून संपूर्ण देशात ‘बीएस-आयव्ही’ इंधनाच्या वापराला सुरुवात करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, त्यात दिरंगाई झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या दट्टय़ानंतर जाग्या झालेल्या वाहननिर्मात्यांनी घाईघाईत ग्राहकांना सवलती देऊन ‘बीएस-३’ मानक असलेली वाहने विक्रीला काढली. चीनने यापूर्वीच ‘बीएस-४’ इंधनाच्या वापराला सुरुवात केली आहे. आताही आपण आंतरराष्ट्रीय मानकांनुसार एक पाऊल मागेच आहोत. त्यामुळेच १ एप्रिल २०२० मध्ये भारत थेट ‘बीएस-६’ मानक दर्जाचे इंधन वापरण्यास सुरुवात करणार आहे. याचाच अर्थ ‘बीएस-५’ ही पायरी आपण सोडून देणार आहोत.