-सुरेश वांदिले अनुसूचित जाती संवर्गातील बऱ्याच विद्यार्थिनींना देशातील दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळत असतो. अशा विद्यार्थिनींना सर्व प्रकारचं अर्थसहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती’ ही योजना राबवण्यात येते. या संस्थांमध्ये कोणत्या संस्थांचा समावेश होतो?आयआयटी, एनआयटी, आएआयएम, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, केंद्रीय विद्यापीठे आदी संस्थांचा यात समावेश आहे. याशिवाय काही दर्जेदार खासगी शिक्षण संस्था (उदा- बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी, इंडियन बिझनेस इन्स्टिट्यूट) यांचाही समावेश आहे. (या संस्थांची संपूर्ण यादी संकेतस्थळावरील रोजगार लिंक या ठिकाणी बघावयास मिळते.) शिष्यवृत्तीचे स्वरुप काय?या शिष्यवृत्तीमध्ये-(१) अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क,(२) परीक्षा शुल्क,(३) नोंदणी शुल्क,(४) ग्रंथालय शुल्क,(५) संगणक खरेदी शुल्क,(६) जिमखाना शुल्क,(७) संस्थेच्या विकास (डेव्हलपमेंट) कामांसाठीचे शुल्क,(८) वसतिगृह शुल्क,(९) भोजन शुल्क, यांसारख्या बाबींचा खर्च भागवण्यासाठी लागणाऱ्या अर्थसहाय्याचा समावेश आहे. इतर लाभ कोणते? (१) एखाद्या संस्थेतील वसतिगृहात संबंधित विद्यार्थिनीस प्रवेश न मिळाल्यास त्यांना, अशा संस्थेच्या वसतिगृहासाठी जे शुल्क आकाराले जाते ते आणि भोजन शुल्क दिले जाईल.(२) वसतिगृहात न राहाणाऱ्या विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता दिला जाईल.(३) अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांच्या खरेदीसाठी व इतर शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे दरवर्षी १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल. अटी आणि शर्ती (१) संबंधित विद्यार्थिनी महाराष्ट्राची रहिवासी असावी.(२) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.(३) पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी.(४) संबंधित विद्यार्थिनीस प्रथम वर्षास प्रवेश मिळायला हवा.(५) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळामार्फत घेतली जाणारी दहावी आणि बारावीची परीक्षा किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या इतर शैक्षणिक मंडळातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.(६) पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीस बारावीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळणं आवश्यक आहे.(७) थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीस पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमामध्ये किमान ५५ टक्के गुण मिळणं आवश्यक आहे.(८) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनीस पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळणं आवश्यक आहे.या शिष्यवृत्तीसाठी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्गाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनीही अर्ज करु शकतात. मात्र पहिल्या वर्गाच्या प्रवेशासाठी विद्यार्थिनी उपलब्ध न झाल्यासच अशांचा विचार केला जातो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ ही आहे. हा अर्ज maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार लिंक येथे ठेवण्यात आला आहे.संपर्क- आयुक्त समाजकल्याण, ३, चर्च रोड, पुणे- ४११००१ईमेल - swcedn.nattionalscholar@gmail.com