सुनीती देव

बिल्किस बानो ही एक स्त्री आहे. (तिच्या निमित्ताने लिहितांना माझ्या मनात ‘छोटा इंद्रपाल’ही आहे.) बिल्किस कोणत्या धर्माची आहे हा प्रश्नच माझ्या मनात येत नाही. ती एक स्त्री आहे, मीही स्त्री आहे. एवढी एक गोष्ट मला तिच्याशी जोडण्यास पुरेशी आहे. तिला ज्या, अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगातून जावे लागले, ते वाचतांना देखील माणूस थिजून जातो. तिच्यावर अत्याचार करणारे तिचे शेजारी होते, त्यांनी केलेला गुन्हा न्यायालयात सिद्धही झाला. गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

कुठेतरी न्याय मिळाला असे वाटत असतांनाच, १५ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्याच दिवशी, सर्वच्या सर्व ११ गुन्हेगारांना शिक्षेत सूट देऊन, त्यांच्या ‘चांगल्या वर्तणुकीचे’ बक्षीस म्हणून तुरुंगातून सुटका करण्यात आली. बाहेर आल्यावर दोन बोटे उंचावून, सुहास्य मुद्रेने, केलेल्या दुष्कृत्याची जराही खंत न बाळगणाऱ्या नरधमांचे ‘आरती ओवाळून’ स्वागत करण्यात आले, त्यात महिलांचाही पुढाकार होता. हा सर्व घटनाक्रम, वस्तुस्थिती आता सर्वांना वाचून, ऐकून ज्ञात झाली आहे. या निमित्ताने मला भेडसाणारे काही प्रश्न –

१) बिल्किस बानो ही मुस्लिम समाजाची आहे म्हणून तिच्या बाबतीत वेगळे निकष लावण्यात आले का? म्हणून गुन्हेगारांची सुटका केली? अन्याय झाला तर न्यायालयाकडे दाद मागण्याशिवाय दुसर पर्याय सामान्य व्यक्तीकडे नसतो. परंतु ‘न्याय’ हा देखील धर्मनिहाय दिला जाणार का? असे असेल तर हे अत्यंत भयावह, घातक आहे. न्याय ही बाब जात, धर्म, लिंग, वर्णनिरपेक्षच असायला हवी.

२) चांगल्या वर्तणुकीचा दाखला देत, प्रमाणपत्र देत या सिद्धदोष गुन्हेगारांना ‘मुक्त’ केले, ती कोणत्या प्रकारची होती? त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. हे गुन्हेगार एवढे ‘चांगले काय वागलेत’ की एकदम त्यांची सुटकाच कराविशी वाटली सरकारला? त्यांची चांगली वर्तणूक नेमकी काय होती ते सामान्य जनतेला कळायला हवे.

३) या गुन्हेगारांना बिल्किस बानो ओळखते. आता हे गुन्हेगार तुरुंगातून सुटल्यावर ती व तिच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे काय? की सर्वांनीच कायम दहशतीच्या सावटाखालीच जगायचे? तिची मुलगी तरुण आहे, तिच्या जीवाला काही धोका झाला तर?

४) ‘निर्भया’ च्या बाबतीत देश पेटून उठला. (उठायलाच हवा होता.) गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली. पण बिल्किस बानोच्या बाबतीत जनक्षोभ का उसळला नाही? आपण इतके ‘असंवेदनशील’ कसे झालोत? स्त्री चळवळी थंडावल्यात का? स्त्री आहे तर स्त्रियांनीच उठाव करावा? मुस्लिम आहे तर मुस्लिम स्त्रियांनी पेटून उठावे. आम्हाला त्याचे काय? ही वृत्ती असेल तर आपण कालचक्र उलटे फिरवीत आहोत हे ध्यानात ठेवले पाहिजे.

५) वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांनी, क्षीण का होईना, आवाज उठविला. पण माझी मैत्रीण म्हणते त्याप्रमाणे घोषणा, निषेध, मोर्चा हे सर्व आम्ही किती दिवस करत राहणार? (करायलाच हवे हे मान्य करून.) त्याच्या पुढे काय?

आमच्याजवळ कृती आराखडा (ॲक्शन प्लान) आहे का? नागरिकांचा दबावगट का निर्माण होत नाही? इतके दिवस झालेत गुन्हेगारांच्या सुटकेला परंतु एकही जबाबदार, अधिकारी राजकीय नेतृत्व तोंडातून शब्द काढीत नाही. ही ‘चुप्पी’ कधी तोडणार? तोंडाला घातलेले कुलूप केव्हा उघडणार?

६) सुटका केलेल्या गुन्हेगारांपैकी दोघे ‘ब्राह्मण’ होते, ‘सुसंस्कारित’ होते. ‘ते बलात्कारासारखे नीच, नींदनीय कृत्य’ कसे करू शकणार? इति एकजण. माझ्या मनात आले ‘जात’ हे तुमच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र कसे काय असू शकते?

मुख्य मुद्दा असा की आपण एखाद्याच्या जातीचा उच्चरवाने, सार्वजनिकरित्या उल्लेख कसा करू शकतो? तोही एखाद्या जबाबदार राजकीय व्यक्तीने करावा? हा देश, या देशाचे राजकारण जात, धर्म, वंश आदी गोष्टींवर आधारित असणार नाही, असूच शकत नाही. संविधान आणि फक्त संविधानच राजकारणाचे अधिष्ठान आहे, होते आणि यापुढेही राहीलच.