सोनाली कुलकर्णी

२४ मे २०१० रोजी माझं लग्न नचिकेत पंत-वैद्य (सीईओ -बालाजी टेलिफिल्म्स ) याच्याशी अगदी साधेपणानं झालं. आज आमच्या लग्नाला १२ वर्षं तर आमची लेक कावेरी हिच्या वयाला नुकतीच १० वर्षे पूर्ण झालीत. लग्नाआधीपासूनच मी करिअरमध्ये किती व्यग्र होते याची माझ्या चाहत्यांना कल्पना आहेच. लग्नानंतरही त्याला कुठेही थांबा लागला नाही, उलट ते अधिकच बहरत गेलं, याचं सारं श्रेय माझ्या कुटुंबीयांना, माझ्या मदतनीसांना आणि माझ्या लेखक-दिग्दर्शकांना. अभिनेत्रींच्या विवाहानंतर, विशेषतः मातृत्वानंतर त्यांची कारकीर्द बॅकसीटला जातं, असं म्हणतात खरं, पण माझा अनुभव खूपच वेगळा आहे. माझ्या करिअरचा ना मला आईपण अनुभवण्यात अडथळा आला ना आईपणाचा त्रास माझ्या करिअरला झाला. अर्थात, मी माझं करिअर मनापासून करू शकले याचं संपूर्ण श्रेय नचिकेत, त्याचे आई वडील, माझे आई-वडील आणि मुख्य म्हणजे माझी लेक कावेरी या सगळ्यांना आहे, मला नाही.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

आणखी वाचा : अँटी एजिंग’ सौंदर्यप्रसाधनं कशी निवडाल?

माझं व्यावसायिक आयुष्य फारच व्यग्र असणारं आहे. एखादी भूमिका माझ्याकडे आली, की त्या त्या व्यक्तिरेखेप्रमाणे कॉस्च्युम, ॲक्सेसरी, लुक, मेकअप असतो. फोटोशूट, ॲवॉर्ड फंक्शन, रेड कार्पेट, ॲड फिल्म शूट, याशिवाय एअरपोर्ट लुक, ट्रॅव्हल लुक अशी अनेक व्यवधानं सांभाळावी लागतात. त्यानुसार स्वतःला प्रेझेंट करणं अपरिहार्य असतं. त्यासाठी अनेक मदतनीसांची मदत होत असते. त्यात माझ्या गाडीच्या चालकाचंही योगदान अत्यंत महत्त्वाचं. त्यांच्यामुळे मी निर्धास्तपणे इच्छित स्थळी आणि इच्छित वेळी पोहोचू शकते. या सगळ्या मदतनीसांखेरीज माझे प्रोफेशनल लाइफ सुरळीत पार पडूच शकणार नाही. त्यांच्यामुळेच माझ्यातील अभिनेत्री आजपर्यंत सहज आणि उत्स्फूर्तपणे काम करू शकली. उलट मी असं अभिमानाने म्हणेन, माझा वावर फक्त कॅमेऱ्यासमोर असतो. माझं काम/कर्तृत्व फक्त ॲक्शन आणि कट यामधल्या अवकाशात असतं, पण माझ्यामागे माझी माणसं इतकी जिवाभावाने सगळं मनापासून काम करतात, मला सांभाळतात, तडजोडी करतात, की त्यांच्याशिवाय हे अशक्यच आहे. माझ्या करिअरमध्ये आणि माझ्या करिअरसाठी माझ्या घरच्या आणि या सगळ्या प्रोफेशनल टीमचे अत्यंत मोलाचे योगदान आहे, त्यांची उतराई होणं नाही!

आणखी वाचा : श्रद्धा वालकरसारख्या निर्घृण हत्या का होतात? उत्तर तसे नेहमीचेच… जाणून घ्या!

मी अनेक नोकरी करणाऱ्या, करिअरिस्ट स्त्रियांची तारांबळ पाहिलीये, त्यांच्या बोलण्यातून जाणवलं, त्यांना म्हणावा तसा सपोर्ट घरून मिळत नाही. अगदी जोडीदाराकडूनही नाही. माझा आणि नचिकेतचा प्रेमविवाह झाल्यानं एकमेकांच्या करिअरबद्दल आम्ही जाणून होतो. लग्नापूर्वींपासूनच नचिकेतला माझ्या अभिनयाबद्दल, माझ्या कामाबद्दल अतिशय आदराची भावना होती, जी लग्नानंतर आणि एका तपानंतर कमी झाली नाही उलट वाढलीये. मला नचिकेतनं कायम समजून घेतलं, माझी कामावरची निष्ठा समजून घेतली, घरच्या जबाबदाऱ्या स्वत:हून स्वत:वर घेतल्यात. कावेरीच्या जन्मापासून तिला मनापासून सांभाळलं. एक पती म्हणून आहेच, पण पिता म्हणूनही मी त्याला शंभर टक्के गुण देईन. जर आपल्या जोडीदाराच्या कामाबद्दल आदर, विश्वास असेल तर दोघांच्याही आयुष्याचे मार्ग सुकर-सोपे होऊन जातात.

आणखी वाचा : शिक्षिका ते पारिचारिका; ‘या’ क्षेत्रात स्त्रिया ठरतात सर्वोत्तम

निव्वळ अभिनयावर माझं प्रेम असल्यानं मी या व्यवसायात आले. करिअरमध्ये वाहवत जाणं ही ना कधी माझी मानसिक गरज होती, ना आर्थिक. पण अनेक उत्तम भूमिका माझ्याकडे चालून आल्या. त्याचंही श्रेय मी लेखक आणि दिग्दर्शकांना देईन, त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला, जो मी सार्थ ठरवला. मला आणि नचिकेतला मनापासून बाळ हवं होतं म्हणून मी मातृत्वाचा निर्णय घेतला. माझ्या या बाळंतपणाच्या काळात माझ्या आई-वडिलांनी मला आणि कावेरीला सांभाळलं, जिवापाड माया केली. कावेरी मोठी होऊ लागली तेव्हा नचिकेतचे आई-बाबा होतेच आमच्या सोबत. घरी मदतीला लोक होतेच. इतकं सगळं असूनही कावेरी मोठी होत असताना अगदी दररोज मला ‘गिल्ट’ यायचा. मी कावेरीला वाढवताना माझ्या करिअरला प्राधान्य देतेय हे चूक की बरोबर? कावेरीला द्यावा लागणारा वेळ मी अभिनयात घालवतेय का? आई म्हणून मी तिला आणखी वेळ द्यायला हवा का? कावेरी मोठी झाल्यावर काय म्हणेल? अशा अनेक विचारांची जेव्हा जास्तच गर्दी व्हायला लागली. तेव्हा नचिकेतशी बोलले आणि त्याने हा गिल्ट मनातून काढण्यास मदत केली.

आणखी वाचा : मसाल्याचा ‘हा’ पदार्थ पाळीच्या त्रासांवर आहे अत्यंत गुणकारी!

नचिकेत म्हणाला, “कावेरी जसजशी मोठी होईल तिला तुझा अभिमान वाटेल, तुझ्या परफॉर्मन्स, अभिनयाबद्दल तिला कौतुक वाटेल. कावेरीकडे लक्ष देणारे, तिचे लाड करणारे आम्ही सगळे घरातले आहोतच. तिच्यावर कुठलाही अन्याय होत नाहीए ना ती प्रेमाला पारखी आहे. कसलीही खंत न बाळगता तू तुझ्या अभिनयावर लक्ष केंद्रित कर. तू ज्या दिवशी फ्री असशील तेव्हा तो आपल्या तिघांसाठी ‘क्वालिटी टाइम’ असेल. शिवाय करिअर सोडून घरी बसणारी आईच आपल्या मुलांवर खूप प्रेम करते असं नाही. आई ही आई असते.” नचिकेतच्या या शब्दांनी माझा गिल्ट कमी झाला आहे, पण तरीही ती भावना तशी पूर्णतः नाहीशी झालेली नाही. आजही मला वाटत राहतं, कावेरी शाळेतून घरी येते तेव्हा मी घरी असावं, तिच्याशी गप्पा मारत जेवावं. मुंबईत शूटिंग असलं, की मी शूटिंगनंतर घरी येते, पण अनेकदा शूटिंगसाठी मुंबईबाहेर, राज्याबाहेर जावं लागतं, मग मी कासावीस होते. अशा वेळी कावेरीमधला कमालीचा समंजसपणा मला स्तिमित करतो. ती म्हणते, “आई तुला वेळ असेल तेव्हा आपण गप्पागोष्टी करू, एकत्र वेळ घालवू. आमच्या टीचर सांगतात,‘एकाच दिवशी एकाच वेळी सगळ्या विषयांचा अभ्यास होत नाही. मराठी पिरियडला सायन्सचा विचार कशासाठी करायचा? सायन्सचा पिरियड आला, की तेव्हा त्या विषयांचा अभ्यास करायचा.’ त्यामुळे सगळ्या गोष्टीं एकाच वेळी नाही करायच्या.” हे एकून मी शांत होते.
कावेरीच्या शाळेचे- पेरेंट्स मीटिंग्स, स्नेहसंमेलन, तिच्या महत्त्वाच्या स्पर्धा, जिथे जिथे माझी पालक म्हणून उपस्थिती आवश्यक असते तिथे मी जातेच. कावेरीच्या शाळेतल्या मित्राने एकदा तिला विचारलं, “तुझी आई ॲक्टिंग करते का?” कावेरीला हे ऐकून खूप आनंद झाला. तिने मला रात्री खूश होऊन सांगितलं, “अगं आई, तुझा एक फॅन माझ्या वर्गात आहे. त्याने मला तुझ्याबद्दल विचारलं.” मग कावेरी आणि तिचे हे वर्गमित्र एकदा माझ्या शूटिंगच्या सेटवर आले. त्यांनी शूटिंगचं कसं करतात ते पाहिलं. त्यांच्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता. कावेरी खूश होती आणि तिच्यामुळे मीही.
मिळालेला वेळ कावेरीसोबत, कुटुंबाबरोबर घालवताना मिळणाऱ्या अपरिमित आनंदाला नाव नाही, एवढं मात्र नक्की.

आणखी वाचा : सॅनिटरी पॅड्समधल्या ‘या’ रसायनामुळे कॅन्सरचा धोका? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

पालकत्वाच्या टिप्स –
मला असं नेहमी वाटतं, आपण पालक असलो तरीही आपल्या मुलांना आपली मालमत्ता समजू नये, त्यांच्यावर सत्ता गाजवू नये, मुलांना सतत हे करू नकोस, तसं वागू नकोस. करू नये. मुलांनाही आदर द्यायला हवा. मुलांचे अनावश्यक लाड करू नये, पण त्यांचा अपमानही करू नये. लहान असतानाही त्यांच्याशी बोबड्या बोलीत बोलू नये. साध्या-सोप्या आणि त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधावा. मुलांना शिस्त लागली पाहिजे असं वाटत असल्यास आधी घराने शिस्तीत वागले पाहिजे. वेळच्या वेळी खाणं-पिणं व्हायला हवं, मुलांचेही रुटीन असावे, त्यांनाही शिस्त असली पाहिजे. फक्त शाळेचे प्रगती पुस्तक पाहून पालक म्हणून त्यावर स्वाक्षरी करणं म्हणजे पालकत्व नाही. ‘बाळा, छान मार्क्स मिळवले हा.’ इतकी शाबासकी देणे म्हणजे पालकत्व नाही. मुलांशी सतत गप्पा मारल्या पाहिजेत. उपदेशाचे डोस न पाजता बोधप्रद शिकवलं पाहिजे. आपल्याविषयी त्यांच्या मनात प्रेमाबरोबर आदर वाटायला हवा. मग सारं छान होतं.
samant.pooja@gmail.com