डॉ. सारिका सातव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या धावपळीच्या आयुष्यात खूप जणांच्या तोंडून एक वाक्य आपण नेहमी ऐकतो, “बीपी खूप वाढलंय, रोज गोळ्या घ्याव्या लागतात.” कदाचित या वाक्याला आता काही वयोमर्यादा राहिलेली नाही. पूर्वी वय वर्षे 40 -50 च्या पुढील मंडळींमध्ये अशा गोष्टींवर चर्चा व्हायची. आता मात्र याला वयोमर्यादा नाही. उच्च रक्तदाबाचा त्रास कुठल्याही वयात सुरू होऊ शकतो आणि वाढू शकतो. रक्तदाब विशिष्ट प्रमाणापेक्षा/ साधारण प्रमाणापेक्षा जास्त वाढणे यालाच उच्च रक्तदाब म्हणतात.

आनुवंशिकता हे महत्त्वाचे कारण असले तरी जीवनशैली आणि आहार हे सुद्धा त्यात मोठ्या प्रमाणात भर घालणारे घटक आहेत. जास्त चरबी असलेले खाद्यपदार्थ अति प्रमाणात खाणे, फास्ट फूड, अतिरिक्त मिठाचे सेवन, पॅकेट फूड जास्त प्रमाणात खाणे, बैठी जीवनशैली, स्थौल्य, अतिताण, कमी झोप, मैदा, साखर, अतिमद्यपान , धूम्रपान इत्यादी अनेक कारणांमुळे रक्तदाब सुरू होतो व वाढतो.
आणखी वाचा : ४७०० कोटींची मालमत्ता असणाऱ्या नेहा नारखेडे आहेत तरी कोण?

रक्तदाब कमी करण्यासाठी औषधी चिकित्से बरोबरच आहार व जीवनशैलीतील बदल खूप महत्त्वपूर्ण आहेत. ज्यायोगे मुळावरच घाव घालता येतो.

१) डॅश डाएट

Direct approach to stop hypertension या शीर्षकाद्वारे एक नवीन आहारशैलीचा उगम झाला. या अंतर्गत आहारामध्ये पुढील बदल केले असता रक्तदाबावर उत्तम नियंत्रण ठेवता येते. त्यापासून स्वतःचा बचाव सुद्धा करू शकता. भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, पूर्ण धान्ये, कमी चरबीचे दूध व दुधाचे पदार्थ, मासे, चिकन, कडधान्य, चांगल्या प्रकारची तेले, बदाम, अक्रोड, तेलबिया इत्यादी पदार्थांचा आहारात नियमित अंतर्भाव करावा.

त्याचबरोबर पुढील पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत किंवा अतिशय नियंत्रित प्रमाणात खावेत.
चरबीयुक्त मांसाहार
चरबीयुक्त दूध व दुधाचे पदार्थ
अतिगोड पदार्थ
खारट पदार्थ
पॅकेज्ड फूड
बाटलीबंद पेये इत्यादी

२) मीठ

साधारणता दिवसभराची मिठाची निरोगी मनुष्याची आवश्यकता एक चमचा म्हणजेच पाच ग्रॅम इतकी असते. मात्र आहारात वरून मीठ घेणे, पॅक फूड जास्त घेणे, (प्रीझरर्व्हेटिव्ह सोडियमयुक्त असणे) खारट पदार्थ, उदाहरणार्थ वेफर्स इत्यादी सतत खाणे, फास्ट फूडचा अतिरेक इत्यादी अनेक कारणांमुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. या अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब वाढला जातो, म्हणून हे पदार्थ टाळणे उपयुक्त ठरते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मिठाचे प्रमाण दोन तृतीयांश टी स्पून एवढे ठेवावे.

आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

३) फायबर
चोथायुक्त आहार जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरातील चरबी व वजन आटोक्यात राहते. पचन प्रक्रिया सुरळीत राहते. भूक नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रॉल, रक्तवाहिनीमधील चरबी नियंत्रणात राखण्यास मदत होते.

हिरव्या पालेभाज्या, सॅलड, फळे, कडधान्ये, धान्यांचा कोंडा इत्यादी पदार्थांमधून फायबर भरपूर प्रमाणात मिळते.

४)पोटॅशियम, मॅग्नेशियम

रक्तदाब नियंत्रणासाठी पोटॅशियम व मॅग्नेशियम अतिशय उपयुक्त आहे. भाज्या फळे यामधून पोटॅशियम, मॅग्नेशियम चांगल्या प्रकारे मिळते. सुकामेवा, विविध प्रकारच्या बिया हे मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहेत.

५) सोडियम नायट्रेट, ट्रान्स फॅट्स

खूप पदार्थांमध्ये प्रामुख्याने नॉनव्हेज फूड मध्ये सोडियम नायट्रेट वापरले जाते. ज्यामुळे अतिरिक्त सोडियमचे शरीरातील प्रमाण वाढते.

तर बऱ्याचशा पदार्थांमध्ये हायड्रोजनेटेड फॆट वापरले जाते. ते ट्रान्स फॆटचा स्रोत असते जे रक्तवाहिन्यांसाठी खूप हानिकारक आहे व अप्रत्यक्षरीत्या रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरते.

आणखी वाचा : नातेसंबंध : सासू-सासरे सोबत नकोत?

एकूणच फूड लेबल्स वाचण्याची सवय हवी. ज्यायोगे कोणता पदार्थ आपण खातोय याची माहिती मिळवून आपणास तो योग्य की अयोग्य याची वर्गवारी आपण करू शकतो.

रक्तदाबासाठी वापरण्यात येणारी औषधे ही फक्त नियंत्रणासाठी वापरली जातात. शरीरावरील उच्च रक्तदाबाचा अपायकारक परिणाम टाळण्यासाठी वापरली जातात. रक्तदाब पूर्णपणे बरा करण्यासाठी नाही. म्हणून आहार व जीवनशैली बदलून आपण नक्कीच औषधांची संख्या व तीव्रता कमी ठेवू शकतो.

dr.sarikasatav@rediffmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How can i control blood pressure know these simple steps nrp
First published on: 28-09-2022 at 11:46 IST