अपर्णा देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या तरुण पिढीने मागच्या पिढीतील काही कुटुंबांचा अभ्यास केला तर अनेक लक्षणीय बदल दिसून येतील. साधारण तीसेक वर्षांचा कालावधी अभ्यासला तर नातं, कुटुंब, शेजारपाजार, गाववाली मंडळी, मित्रपरिवार आणि अगदी जवळची रक्ताची नाती या सगळ्याच पातळीवर खूप जास्त बदल जाणवतो.

कौटुंबिक पातळीवर बोलायचं झालं तर एकत्र कुटुंबात मुलं फारच छान वाढली, गोष्टी वाटून घेण्याची आणि इतरांच्या मताप्रमाणे थोडी मनाला मुरड घालण्याची सवय लागली हे मान्य करावं लागेल. पण प्रत्येक पिढीला काही चांगल्या तर काही वाईट गोष्टींना, अनुभवांना सामोरं जावंच लागतं… म्हणजे बदलाचा तो नियमच आहे. आम्हाला जाणवलेल्या काही अत्यंत नकारात्मक गोष्टींमध्ये कुटुंबाची सामूहिक मालमत्ता आणि त्याबद्दल निर्णय घेण्यात कमालीची उदासीनता किंवा ढिसाळपणा हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. निर्णय घेण्याचा अधिकार कुटुंबप्रमुखास असे. त्याच्या मताप्रमाणे सगळं होई. बाकी भावंडं जास्त बोलली नाही तरी आत असंतोष खदखदत असणार…

आणखी वाचा : करिअर-घर बॅलन्स : “आमचं स्टारपण उंबरठ्याबाहेर ठेवून घरात येतो”: निवेदिता सराफ

पणजोबा-पणजी किंवा आजोबा-आजीच्या काळात बांधून ठेवलेली कुटुंबं माळेतून मणी तुटून पडावेत तशी विखुरायची. कारण वेळीच प्रॉपर्टीसंबंधी कायदेशीर कारवाई न करणं हे आहे. पणजोबाची जमीन, वाडा, त्यात काळानुरूप वाढत जाणारे वाटेकरी …आणि नंतर प्रचंड गुंतागुंत. अशाने सख्खी भावंडं एकमेकांचे वैरी होत होती. सगळ्यांना एका धाग्यात बांधणारा धागाच त्यांच्या नात्याचा गळा आवळू शकत होता. प्रॉपर्टीसंबंधीच्या वाटण्या मनासारख्या न होणं म्हणजे पुढे कायमचे संबंध तुटणं!

आजच्या तरुण मुलांना मागील पिढीच्या नात्यातील प्रेमाच्या अत्यंत सुरस कथा ऐकवल्या जातात, पण ही दुसरी बाजू फारशी सांगितली जात नाही. याचा अर्थ असा नक्कीच नाही, की आजच्या तरुणाईला आई-वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात रस नाही, पण आज पालक तुलनेने जागरूक झालेले आणि कुटुंब छोटं झाल्याने पूर्वीसारखी परिस्थिती उद्भवत नाही किंवा अत्यंत कमी प्रमाणात उद्भवते असं म्हणू या.

आणखी वाचा : मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण

हे सगळं बघून प्रश्न पडतो की, नातं नेमकं खूप जवळचं, विश्वासाचं कुठपर्यंत असतं? तर उत्तर येतं, पैसा मध्ये येत नाही तोपर्यंत! बेहिशोबी नातं जपणं खरंच कठीण आहे! एकदा का नात्यात पैसा, हिशोब, देवाणघेवाण याला महत्त्व आलं की तेव्हा ठिणगी पडतेच, असाच बहुतांशी अनुभव आहे! तशी ठिणगी न पडण्यासाठी मोठ्या मनाची माणसं लागतात… ज्यांचं प्रमाण दर पिढीमागे घटतच जातंय.

आजची तरुण पिढी त्या मानाने फारच नशीबवान म्हणायला हवी. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयांत आर्थिक सुबत्ता आहे, आणि शिवाय पालकांकडून मिळालेली स्थावर मालमत्ताही आहे. म्हणजे एकमेकांना प्रेमाने भेटणं, अडीअडचणीला मदतीला धावणं, इतकंच करायचं बाकी असतं. तरीही सगळे का म्हणतात की नात्यात पूर्वीसारखे प्रेमाचे संबंध आज कुठं उरलेत?
आमचं नेमकं काय चुकतंय?

adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joint family living together relationship spoils due to money nrp
First published on: 06-09-2022 at 13:55 IST