दिपाली पोटे – आगवणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दशकं क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केलं आाणि निवृत्ती पत्करली. या खेळाच्या प्रवासाला तिने वयाच्या १५ व्या वर्षी सुरुवात केली.

१९९७ साली पार पडलेल्या महिला विश्वचषकामध्ये प्रथमच झुलनने मुलींना क्रिकेट खेळताना पाहिलं. इडन गार्डनवर या चषकाचा अंतिम सामना खेळाला गेला त्यावेळी झुलन तेथे मैदानाच्या बाहेर बॉल गर्ल म्हणून काम करत होती. ऑस्ट्रेलिया संघाने तो सामना जिकल्यानंतर संपूर्ण संघ जेव्हा मैदानाला गोल चक्कर मारत होता त्यावेळी झुलनच्या मनात असा विचार आला की, मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तर मला देखील माझ्या देशासाठी खेळण्याची संधी मिळेल.

झुलनच्या मनात आलेला हा विचार सत्यामध्ये उतरवणं तिच्यासाठी काही सोपं नव्हतं. झुलनने जेव्हा क्रिकेट खेळण्याचे ठरवले तेव्हा तिच्या आई-वडिलांचा याला प्रचंड विरोध होता कारण त्यावेळी महिला क्रिकेटला पाहिजे तेवढी प्रसिद्धी आणि वावही नव्हता. अशा क्षेत्रामध्ये जाऊन काही भविष्य नाही असं तिच्या घरच्यांचं ठाम मत होते. परंतु तिच्या आजीनं तिला कायम साथ दिली. त्यावेळी एकदा कोलकाता येथे महिला विश्वचषकाचे सामने चालू असताना झुलन आणि तिचे वडील ते सामने पाहण्यासाठी गेले त्या मुलींना देशासाठी खेळताना पाहून तिही प्रेरित झाली. त्या मुलींमधील असलेला जोश, उमंग, तिच्यातही संचारला आणि तिने क्रिकेट क्षेत्रातच करियर करण्याची परवानगी घरून मिळवली. लहानपणी आपल्या भावासोबत क्रिकेट खेळल्यामुळे झुलनला क्रिकेट या खेळाची चांगलीच ओळख पटली होती.

झुलनच्या मते, क्रिकेट हा खूपच आव्हानात्मक खेळ आहे. त्यासाठी आपल्यामध्ये त्याबद्दल प्रचंड आवड, महत्वकांक्षा आणि जिद्द असली पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. आपण आपल्या देशासाठी खेळतो हीच गोष्ट नेहमी प्रेरणा देते. म्हणूनच ती आज हे यशाचे शिखर गाठू शकली.

हिऱ्याला पैलू पाडताना अनेक कष्ट सहन करावे लागतात तेव्हाच तो चमकतो तसेच झुलनला आपल्या खेळाला सुरुवात करताना अनेक संघर्ष करावे लागले. ती राहत असलेल्या चकदहा या गावाच्या आजूबाजूला खेळाच्या सरावासाठी इतक्या चांगल्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे तिला क्रिकेटच्या सरावासाठी रोज कोलकात्याला जावे लागत असे. परंतु आधी ट्रेन आणि त्यानंतर बस असा अडीच तास आणि यायला अडीच तास असे एकूण पाच तास ती केवळ प्रवासामध्ये घालवत होती. परंतु तिच्यामध्ये असलेल्या खेळाच्या जिद्दीपुढे तिला बाकी गोष्टी काही महत्वाच्या वाटत नव्हत्या.

या पाच तासाच्या प्रवासामध्ये ट्रेन मध्ये असलेले इतर सहप्रवासी झुलन क्रिकेट हा खेळ खेळते म्हणून अनेक टोमणे मारत असत. तू इतक्या सकाळी उठून क्रिकेट खेळायला जातेस, तुझ्या घरातील लोक वेडे झाले आहेत का, या वयामध्ये तू अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. अशा अनेकबोचऱ्या टोमण्यांनी झुलनचा हा प्रवास सुरू होत असे परंतु त्यावेळी क्रिकेटच्या सरावाशिवाय तिने कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले नाही. या प्रवासामध्ये तिला अनेक खेळ खेळणारे खेळाडू देखील भेटायचे त्यामुळे तिचा प्रवास हा आनंदाचा होता. झुलनचे प्रशिक्षक स्वपन साधूही अतिशय कडक होते. ७.४५ ते ८ या वेळेत ती मैदानावर पोहोचली नाही, तर त्या दिवशी तिला सरावाला मुकावे लागत असत . खेळामध्ये शिस्त किती महत्वाची असते याचे धडे तिने इथूनच घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे आपल्या चांगल्या खेळीसाठी आपली रोजची दिनचर्या खूप मोठी भूमिका पार पाडते हे तिच्या लक्षात आले.

झुलनने १४ जानेवारी २००२ मध्ये लखनौ येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये प्रवेश केला आणि विशेष म्हणजे झुलनने इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये पदार्पण केले आणि निवृत्ती देखील याच संघासोबत सामना संपल्यानंतर घेतली. झुलनच्या मते, भारत सामना जिकंतो ते सर्व क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय असतात. तिला नेहमी वाटत की या विजयामध्ये माझाही खारीचा वाटा असावा, तिचा खेळ चांगला व्हावा यासाठी ती नेहमीच शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत घेत असते.

आयुष्यातील प्रत्येक दिवस हा महत्वाचा असतो. ‘आज कुछ करेंगे तो कल का सोचेंगे ’असा कायम विचार ती करत असते. या संपूर्ण क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये झुलनला इतक्या जखमा झाल्या की, तिला सामना खेळायला जाण्याआधी फिजिओकडे जाऊन टेपिंग करून घेण्यासाठी एक तासभर लागतो. परंतु याचा परिणाम तिने कधीही खेळावर होऊ दिला नाही.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legendary women cricketer jhulan goswami announced her retirement from all forms nrp
First published on: 30-09-2022 at 09:07 IST