नवीन लागवड करताना चार महिने सतत अन्न पुरवठा होईल अशा बेतानेच पालापाचोळा, काडी कचरा यांचा वापर करत सगळ्या कुंड्या नव्याने भरून घेतल्या. जोडीला वर्षभरात तयार केलेलं कंपोस्ट होतं. एरवी वाळलेल्या पानांचा भरपूर कचरा मिळत असतो, पण पावसाळ्यात मात्र पानं ओलीगच्च होतात. अशावेळी त्यांचा तितकासा वापर करता येत नाही, त्यामुळे सुका पालापाचोळा साठवून ठेवावा लागतो. एकदा तो हाताशी असला की कधीही, चटकन एखादी भाजी लावता येते.

आंब्याच्या पेट्यामधून येणारा पेंढा किंवा चिमणीचं गवत यांचीसुद्धा साठवणूक उपयोगी पडते. यानंतरच महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मांडव तयार करणं. आदल्यावर्षीच्या बांबूच्या काटक्या तपासून नवीन काटक्या रोवत, त्यांना पेललेल इतक्या वजनाच्या जाळीचं आच्छादन करून मांडव तयार करून घेतले.

कडकडीत उन्हानं अवघी सृष्टी पोळून निघत असताना मला मात्र येणाऱ्या पावसाचे वेध लागले होते. शेतकरी जशी पावसापूर्वीची कामं आवरून घेतो तशीच मलासुद्धा माझ्या बागेतली कामं पूर्ण करून घ्यायची होती. लिलीचा बहर अनुभवायचा तर पावसासारखा उत्तम काळ नाही. पावसात आससून बहरणारी, अनेक रंगात फुलणारी लिली अनुभवणं यासारखं सुख नाही.

मागच्या वर्षी मी रेन लिलीचे कंद रंगांप्रमाणे न लावता एकत्रित लावले होते, या वर्षी ते रंगानुसार विभागून लावून घेतले. कर्नाटकातील लेपाक्षी मंदिरात गेले असताना पांढऱ्या रेन लिलींच्या कंदांची अशी एकत्रित लागवड पाहिली होती. वास्तू सौंदर्याने परिपूर्ण अशा लेपाक्षी मंदिराच्या पार्श्वभूमीवर ही नाजूक पांढरी शुभ्र फुलं उठून दिसत होती.

मंदिर परिसरात फिरून तिथला इतिहास जाणून घेताना, तिथल्या सौंदर्याच्या कल्पनेत हरवून जाताना माझं लक्ष मंदिर परिसरा भोवती फुललेल्या त्या नाजूक रेन लिलीवर होतं. हलक्या पावसाच्या सरींच्या साथीने वाऱ्यावर डोलणारी ती इवली नाजूक फुलं पाहाणं हे मनावर गारूड करणार होतं.

त्याचवेळी ठरवलं की, एकदा अशी एकरंगी लागवड करायची. रेन लिलीचे कंद हे अगदी लहानसे असतात. आपल्या छोट्या कांद्यांसारखे कुंडीत एक दोन कंद जरी लावले तरी वर्षभरात त्यांच्यापासून बरीच प्रजा तयार होतात. उन्हाळ्यात ते कंद एकमेकांपासून अलगद सोडवून घेऊन लावून घेतले तर पावसाळ्यात फुलांचा बहर अनुभवता येतो.

यासाठी एखादी आयताकार पसरट कुंडी असेल किंवा एखादं वाटोळं असं मातीचा भांड असेल तर उत्तम. यात पुरेसा सुका पालापाचोळा, थोडं शेणखत किंवा गांडूळखत,थोडं कंपोस्ट वापरून कुंडी भरायची. पावसाळ्याचे चार महिने रोपांना एवढा खुराक पुरतो. रोपांची सुरेख वाढ होते. नवीन कंदांना वाढायला जागा मिळते. उन्हाळ्यात विश्रांती घेऊन सुखावलेले ते इवले कंद पावसाच्या वर्षावात तरारून येतात.

पांढरी, गुलाबी, पिवळी, किरमिजी अशी विविध रंगांची रेन लिली निगुतीने लावून घेतल्यावर पुढचं काम होतं ते अळूचे कंद सोडवून घेण्याचं. वर्षभर अळूची पानं मिळत होतीच, पण पाऊसकाळात होणारी अळूची वाढ ही काही वेगळीच असते. अळूचे कंद सोडवून घेत जास्तीच्या जागेत लावून घेतले. मायाळूच्या काळ्याशार टपोऱ्या बिया जमवून ठेवल्या होत्या. त्याही लावून घेतल्या. घोळाच्या नाजूक काळ्या बिया, हिरव्या माठाचे सुकवलेले तुरे, बियाणांसाठी राखलेल्या घोसाळ्याच्या काळ्याभोर बिया. थंडीत वेलीवर राखलेल्या वाटाण्याच्या शेंगा, भेंडी असं घरचं बियाणं हाताशी होतं.

नवीन लागवड करताना चार महिने सतत अन्न पुरवठा होईल अशा बेतानेच पालापाचोळा, काडी कचरा यांचा वापर करत सगळ्या कुंड्या नव्याने भरून घेतल्या. जोडीला वर्षभरात तयार केलेलं कंपोस्ट होतं. एरवी वाळलेल्या पानांचा भरपूर कचरा मिळत असतो, पण पावसाळ्यात मात्र पानं ओलीगच्च होतात. अशावेळी त्यांचा तितकासा वापर करता येत नाही, त्यामुळे सुका पालापाचोळा साठवून ठेवावा लागतो. एकदा तो हाताशी असला की कधीही, चटकन एखादी भाजी लावता येते.

आंब्याच्या पेट्यामधून येणारा पेंढा किंवा चिमणीचं गवत यांचीसुद्धा साठवणूक उपयोगी पडते. यानंतरच महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मांडव तयार करणं. आदल्यावर्षीच्या बांबूच्या काटक्या तपासून नवीन काटक्या रोवत, त्यांना पेललेल इतक्या वजनाच्या जाळीचं आच्छादन करून मांडव तयार करून घेतले.

घोसाळी, काकडी, कारलं, तोंडली यांसारख्या वेलींसाठी बांबूच्या काटक्या रोवून तयार केलेले मांडव पुरतात. दूधी भोपळा, लाल भोपळा पडवळ यांच्यासाठी मात्र मजबूत जाळी आणि भक्कम असा बांबूचा आधार तयार करावा लागतो. मायाळूचा आणि गोकर्णीचे वेल एकामेकांच्या संगतीने वाढतात.मायाळूची गडद ह्दयाकार हिरवीगार पानं आणि गोकर्णीची निळी गडद नाजूक फुलं असलेला वेल जेव्हा एकत्र वाढतो तेव्हा एखादं हिरवं चित्र काढल्याचा भास होतो. चित्रकार जसा आपल्या चित्रात हवे ते आकार आणि रंग यांचा मेळ साधत एक वेगळाच परीणाम साधतो तसं या दोन वेली आपलं सौष्ठव मिरवत, वैगुण्य लपवत एकीमेकींना जोडून घेत एक नवीन चित्र रेखतात.

प्रत्येक ऋतूबदला आधी बाग तयार करताना मला निसर्गाच्या बदलांमुळे साधणाऱ्या चमत्कृतींची नव्याने जाणीव होते. दर चार महिन्याने चित्र बदलतं, पण तरीही हा बदल प्रत्येक वेळी हवाहवासा वाटतो. चैतन्य निर्माण करतो.

नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा देतो. शेवटी परिवर्तन हा तर निसर्गाचा नियमच आहे नाही का?

मैत्रेयी किशोर केळकर

mythreye.kjkelkar@gmail.com