“ राजू, तिला सांग मी रात्री घरी नाहीये, माझ्याकरिता जेवण बनवण्याची तसदी घेऊ नका म्हणावं.” “आई, बाबा म्हणतात… ”
“राजू, त्यांना सांग, या गोष्टी ऐन वेळी सांगायच्या नसतात, सकाळीच जास्तीच्या पोळ्या करून ठेवल्या त्याचं काय करायचं?”
“बाबा, आई म्हणतीय…”
“राजू, तिला सांग विचारायची पद्धत असते. आपल्याच मनानं सगळं ठरवायचं नसतं. आईवडिलांनीच काही पद्धती शिकवल्या नाहीत. आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येणार म्हणा.”
“आई, बाबा म्हणतात… ”
“राजू, त्यांना सांग, माझ्या आईबापावर घसरण्याचं काही काम नाही, स्वतःच्या आईबापानं काय दिवे लावले ते बघा म्हणावं आधी.”
“बाबा…”
“राजू… तिला सांग, माझ्या आईबापाचं नाव घ्यायचं नाही.”
“आई…”
“राजू, त्यांना विचार आईबापाचं नाव कोणी मध्ये आणलं? काही झालं, की आधी माझ्या आईवडिलांचा उद्धार करायचा. त्यांना मध्ये आणण्याचं काही कारण आहे का? आणि मी बोलले, की फक्त माझं तोंड दिसतं. यांच्या आईनं माझ्यासाठी काय केलं? माझं डोहाळजेवण केलं नाही, मला साडी घेतली नाही, की बाळंतपणात मला आणि बाळाला सांभाळायला सोबत राहिल्या नाहीत. त्यांची कर्तव्यं त्यांनी करायची नाहीत आणि एखाद्या वेळेस माझ्या वडिलांनी कार्यक्रमाला बोलावलं नाही की यांच्या नाकाच्या शेंड्यावर राग येतो. त्यांना पद्धती नाहीत, ही लेबलं लावून मोकळं होतात.”
राजू दोघांच्याही मध्ये उभा होता, एकदा आईकडे वळून बघायचा, एकदा बाबांकडे. राजूच्या लक्षात येईना, हे एकमेकांशीच बोलत आहेत तर माझं नाव का मध्ये घेतात?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : World Aids Day 2022 : अद्याप महिलांमध्ये जागरुकता नाहीच!

त्याचं विचारचक्र सुरू झालं, “यांचं हे नेहमीचंच आहे, आता आजी-आजोबा आणि नाना-नानी यांच्यावरून खूप भांडण होणार आणि पुन्हा नेहमीप्रमाणेच, भांड्यांची आणि वस्तूंची फेकाफेकी, आरडाओरडा, रडारडी, रुसणंफुगणं सगळं सुरू होणार. देवबाप्पा आईबाबांना चांगली बुद्धी का देत नाही? बाबा म्हणतात, ‘कोणाशी भांडायचं नसतं’, मग हे आईशी भांडण का करतात? आई म्हणते, ‘कोणीही चिडवलं तरी चिडायचं नाही. आपण शांत बसायचं, चिडवणाऱ्याला आपली चूक आपोआप कळते.’ मग आई का चिडते? असं का भांडण करतात हे दोघे जण?”
“ मला दोघांनाही सरप्राइज द्यायचं होतं. मला चित्रकला स्पर्धेत मिळालेलं बक्षीस त्यांना दाखवायचं होतं. माझा होमवर्क आईच्या मदतीने पूर्ण करायचा होता, पण त्यांची भांडणं आता लवकर संपणार नाहीत. मला खरं तर खूप भूकही लागली आहे; पण आता दोघंही ऐकणार नाहीत.” राजू शेजारच्या मंजिरीकाकूंकडे गेला आणि त्यांच्याच बेडरूममध्ये तस्साच उपाशीपोटी झोपून गेला. मंजिरीताई रूममध्ये आल्या तेव्हा त्याला झोप लागली होती. त्याच्या केसांवरून हात फिरवताना त्यांच्या मनात विचार येत होते, एवढ्याशा लेकरालाही किती ताण सहन करावा लागतोय आणि याची जाणीव त्याच्या आईवडिलांना अजिबात नाहीये. पती-पत्नीच्या वादात शेजारच्यांनी कशाला लक्ष घालायचं म्हणून इतके दिवस त्या शांत राहिल्या, पण आज राजूची अवस्था बघून त्यांना राहवेना. त्यांनी नचिकेत आणि नीलिमा या दोघांशी बोलायचं ठरवलं.

आणखी वाचा : आई-वडिलांच्या निधनानंतर पोरकी झाले, २२व्या वर्षात लग्न केलं पण वर्षभरातच…

दोघांनाही त्यांनी घरी बोलावलं, “बघा, राजू कसा झोपलाय. तो शाळेतून आला तेव्हा किती आनंदी होता. त्याला तुमच्या दोघांशीही बोलायचं होतं, त्याच्या आनंदाचे क्षण तुमच्याशी शेअर करायचे होते; पण तुमचे आपसातील वाद संपतच नाहीत. तेही इतक्या मोठ्याने बोलता की माझ्या घरीही स्पष्ट एकू येतं. . दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत राहता. एका छोट्याशा गोष्टीवरून गाडी भलतीकडेच सरकते आणि एकमेकांच्या आईवडिलांना तुम्ही दोष देत राहता, यामुळं घरातील वातावरण बिघडतंच, पण छोट्या राजूवरही याचा परिणाम होत आहे. तुम्हाला वाटतं, मुलांना काय समजतं? पण मुलांना सगळं कळतं. आईवडिलांच्या सततच्या वादामुळे मुलं असुरक्षित वातावरणात जगत राहतात. त्यांना या वयातही ताणतणावाला, नैराश्याला सामोरं जावं लागतं. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर याचे विपरीत परिणाम होतात. त्यांच्यात अनेक वार्तानिक समस्या निर्माण होतात आणि मुलं असं का वागताहेत हे आईवडिलांना समजत नाही. या सर्वाला आपणच जबाबदार आहोत हे लक्षात येईपर्यंत वेळ गेलेली असते.”

आणखी वाचा : गेमिंगः तरुणींची संख्या वाढतेय; करीअरचा नवा पर्याय!

“होय काकू, तुमचं म्हणणं खरं आहे, कारण आता तो सात वर्षांचा होईल; पण सध्या तो अंथरुणातच सुसू करतो. मी यावरून त्याला सारखी रागावते, पण कदाचित आमच्या दोघांच्या भांडणाचा हा परिणाम असावा,” इति नीलिमा.
नचिकेतलाही काही गोष्टी आठवल्या, “काकू, परवा एकदा कोणत्या तरी गोष्टीवरून तो चिडला होता आणि मी घरातून निघूनच जाणार आहे, असे म्हणत होता.” “नचिकेत आणि नीलिमा, तुम्ही दोघेही राजूसमोर अशी भांडण टाळा. प्रत्येक पती- पत्नीमध्ये काही मतभेद आणि वादविवाद असतात, पण ते एकमेकांना समजावून घेऊन सामंजस्याने मिटवणं गरजेचं आहे. मुलांसमोर तुम्ही दोघं एक आहात हे दाखवायला हवं. नुसतं महागडी खेळणी आणि खाऊ देऊन मुलांना खूश केलं की आपण चांगलं पालकत्व निभावलं असं होत नाही. त्यांची जडणघडण योग्य रीतीनं होण्यासाठी आईवडील म्हणून तुम्हालाही काही पथ्य पाळणं गरजेचं आहे.”
“काकू, आमच्या दोघांचंही चुकलंच. पुन्हा आम्ही त्याच्यासमोर असं भांडणार नाही.” नचिकेतने आपल्या चुकांची कबुली दिली. नीलिमालाही खूप अपराधी वाटलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत किती तरी वेळ ती मनातल्या मनात राजूची माफी मागत राहिली.
smitajoshi606@gmail.com
( लेखिका कौटुंबिक न्यायालयात विवाहसमुपदेशक आहेत)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage counselling relationship dont entertain sons and daughters in couples quarrels vp
First published on: 02-12-2022 at 07:42 IST