तन्मयी तुळशीदास बेहेरे
सोसायटीच्या महिला स्नेहसंमेलनात कोजागिरीचे बेत सुरु होते. कित्येकींचा युक्तिवाद बंगाली की गुज्जू फॅशनच्या साड्यांवर घुटमळत होत्या. यंदा डीजे मराठी ठेवू म्हणजे आपल्याला समजणाऱ्या गाण्यांवर दांडिया रमू शकतो असाही एक ज्वलंत मुद्दा होता. एफबी इन्स्टा ट्विटरवर लाईव्ह जाण्यासाठी सोसायटीचं सोशल मीडिया हॅन्डल प्रत्येकीला टॅग कसं होईल याचा क्रॅश कोर्स सुरूच झाला होता. त्यात दरवर्षी कोजागिरीला सोसायटीच्या गच्चीवर ते मसाला दूध आणि बोरिंग बटाटेवडे खायचा आता कंटाळा आला आहे, असा सूर अचानक आला. मग आता या वर्षी काहीतरी वेगळं करूया का? अनायासे कोजागिरीला विकेण्ड आला आहे, तर जरा सोसायटीच्या बाहेर पडू या का? या प्रश्नानं सर्व वातावरणच बदललं. ‘काल ऑफिसच्या गरब्याला जाते म्हटलं तर पाठवल नाही हिने आणि आज कोजागिरी बाहेर कुठेतरी जाऊ म्हणून डिमांड करते आहे!’ कौमुदी वैतागलेलीच होती पण आई पुढे अर्थातच तिचे काही चालले नाही. दसऱ्यानिमित्त छत्रपतींवरील डॉ अमोल कोल्हेंचा ‘गरूडझेप आग्र्याच्या सुटकेचा थरार’ हा सिनेमा सोसायटीतल्या सर्वानी फर्स्ट डे- लास्ट शो पाहीला होता. ‘प्रत्यक्ष आग्र्यावरून सुटका झाल्यावर महाराज जिथे पहिल्यांदा गेले त्या राजगडाला आपण भेट द्यायला हवी असं सिनेमा पाहून मला वाटलं. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड सर्वांनाच स्फूर्तिदायक ठरेल’ प्रिया काकूने कल्पना मांडली.

आणखी वाचा : या सुषमा अंधारे आहेत तरी कोण?

Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी

प्रिया काकूने बरेचसे गड किल्ले यांचे ट्रेक प्रसिद्ध इतिहास संशोधक आप्पा परब यांच्यासोबत केले होते. त्यामुळे गडकिल्ल्यांचा इतिहास, भूगोल, शिवचरित्रातील त्याचे स्थान आणि तिथे घडलेल्या ऐतिहासिक घटना ह्यांचे ज्ञान तिला होते. ‘नाही हो चार पाच तास कोण चालणार? मी तर बाई लिफ्ट बंद असेल तर दुसऱ्या माळ्यावरून खाली उरतही नाही.’ भिडे काकू कुरकुरल्या. ‘अरे दोन महिने डाएट करून आत्ता एक किलो कमी झाले एक दिवस ट्रेक करून काय होणार माझं’ सोनल म्हणाली. ‘चालायचं वगैरे ठीक आहे हो पण मी टॅन होईन त्याच काय?’ गौरी ने प्रातिनिधिक शंका काढली. ‘आणि जेवायचं काय’ देशमुख काकूना नेहमी प्रमाणे खाण्याचचं टेन्शन.. अखेर प्रत्येकीच्या शंकेचं निरसन होऊन ही महिला आघाडी यंदाच्या कोजागिरीला ट्रेकला जायला तयार झाली. कौमुदीच्या आईचा उत्साह तर बघायलाच नको नवीन शूज काय नवी सॅक काय? एकदम ओके, जसा काही एव्हरेस्टच सर करायला निघणार आहे. सोसायटीच्या प्रत्येक घरात थोड्या फार फरकाने हेच संवाद सुरु झाले होते.

आणखी वाचा : मेरे पास माँ हैं…

अखेरीस, शनिवार पहाट उजाडली आणि सोसायटीत कोजागिरी रात्री करिता निघालेल्या या ट्रेकमूळे एकच गोंधळ सुरु झाला. बरोबर पाच वाजता महिला आघाडीला ट्रेकला नेणारी बस सोसायटीमध्ये दाखल झाली आणि एकच झुंबड उडाली, सर्वांनी आपापल्या जागा पकडल्या, बॅगा लावल्या आणि बस सुरु झाली. बसने आतापर्यंत जुईनगर ओलांडलं असेल तसं ”माका तर मालवाणक जाणाऱ्या एसटीची आठवण यता” राणे काकू माहेरच्या आठवणीत रमल्या. बायकांच्या घरगुती, सोशल अशा गप्पा सुरु असताना मुलींनी मात्र ‘काला चष्मा’ गाण्यावर नाचायला सुरुवात केली. पण पुढे जस झिंगाट गाणं लागलं तसं सगळ्या गप्पिष्ट महिलांना गौरीने बसमध्येच नाचायला लावलं. कौमुदी मात्र अजूनही आई वर चिडलीच होती पण झिंगाट लागल्यावर तिचा मूड चेंज झाला… एक झक्कास शिटी वाजवली तिने… अखेर बस ने पुणे सोडून नसरापूर गाठलं.

आणखी वाचा : पोन्नीयिन सेल्व्हन: इथे स्त्रिया राज्य करतात…

बेसला पोहोचेपर्यंत ९ वाजले होते, अश्विन महिन्यातला गारवा हवेत जाणवत होता. मध्येच पावसाची एक सर येऊन गेल्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं होतं. पाती चहा, शेंगदाणे घातलेल्या पोह्यांचा आस्वाद घेत मंडळी ताजीतवानी झाली. लाल मातीचा ओला सुगंध उरात भरून घेऊन स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावर चढायला त्यांनी सुरुवात केली.

आणखी वाचा : भारतीय क्रिकेट संघाचा तोफखाना : रेणुका सिंह ठाकूर

‘हा डोंगर आधी मुरुंबदेवाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता. महाराजांनी त्यावर किल्ला बांधला त्याला राजगड नाव दिले. या गडावर कोणत्याही बाजूने येताना टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते म्हणून महाराजांनी राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी केलं आणि २५ वर्ष इथूनच राज्यकारभार केला’, प्रिया काकू सहज चालता चालता ही माहिती देत होती. कोजागिरीचा हा ट्रेक मस्त उत्साहात सुरु झाला होता आणि छत्रपतींच्या गोष्टींमुळे सर्वजणी खूपच भारावून गेल्या होत्या. पण जस जसं ऊन चढू लागलं तस तशी भिडे काकूना धाप लागू लागली. ‘ए बाई! मी नाही पुढे येणार’ म्हणत त्या बसल्याच. गौरी आणि कौमुदी ‘चला ना काकू आता थोडाच राहिलं… तुम्ही इलेक्ट्रॉल पीता का म्हणजे तुम्हाला एनर्जी येईल’ असा धीर देत त्यांच्यासोबत चालत होत्या. ‘एरवी बघाल तर भिडेबाईंना बघून कौमुदीच तोंड वाकडं होतं, पण आता त्यांची अवस्था बघून त्यांना ती मदत करतेय… सुधारली हो माझी पोरगी’, कौमुदीची आई हळूच रणदिवे काकूंना म्हणाली. मधेच सोनलच्या बुटाचा सोलच निघाला तेव्हा ‘तुका स्लीपर होयी?’ म्हणत राणे काकूने तिला त्यांची एक्स्ट्रा स्लीपर दिली. एकमेकींबद्दलचे हेवेदावे, भांडणं, अपमान विसरून एकमेकींना सांभाळून घेत, एकमेकींच्या कलाने घेत मंडळी हसत खिदळत कधी गडावर पोहोचली कळलं सुद्धा नाही. प्रिया काकू समाधानाने हसली. महाराजांचा प्रभावच असा आहे की प्रत्येक मराठी माणूस आपले राग, लोभ, विसरून त्यांच्या पराक्रमापुढे नतमस्तक होतोच तर आम्ही काय चीज? हा विचार करून काकूने खाली वाकून राजगडावरची माती माथ्यावर लावली, आणि बाकी सर्वजणींनी त्याच अनुकरण केलं. यंदाची कोजागिरी ही वेगळी असणार हे जणू सर्व जणींना पक्कं कळलं होतं.

आणखी वाचा : कोण आहेत कॅरोलिन बेर्टोझी?

पुढे पद्मावतीच्या मंदिरात सारे पोहोचले तोपर्यंत दुपार सरत चालली होती तेंव्हा ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि मिरचीचा ठेचा असं गावरान जेवण करून अष्टप्रधान मंडळींचे वाडे, सईबाईंची समाधी, राजवाडा, सदर, घोड्यांची पागा, दारूखाना यांचे अवशेष पाहून मंडळींनी बालेकिल्ल्याकडे कूच केले. आता मात्र भिडे काकुनी पहिल्याच पायरीवर ठिय्या दिला, ‘दिवसभर खूपच कॅलरीज बर्न झाल्या. आता पुरे’ म्हणत सोनलने भिडे काकूंच्या शेजारची जागा पटकावली. बाकीची हौशी मंडळी बालेकिल्ल्यावर पोहोचली. ‘प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ बालेकिल्ल्यावर महाराजांचा जयजयकार कौमुदीच्या आवाजाने दुमदुमला सर्वांचीच छाती तेंव्हा अभिमानाने फुलून गेली. हा विलक्षण क्षण मनात जपून ठेवत मंडळींनी संजीवनी माचीची वाट धरली. राजगडाचे वैशिष्ट्य असलेल्या चिलखती तटबंदीवरून चालणं हा एक चित्तथरारक अनुभव होता. दोन्ही बाजूला दरी, घोंगावणारा वारा, समोर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि न थकता पुढे पडणारी पावलं टाकत मंडळी तळ्यापर्यंत पोहोचली. तोपर्यंत सूर्य अस्ताला जात होता. मावळतीचे रंग आकाशात पसरले होते. ढगांशी लपंडाव खेळत सूर्य दरीत नाहीसा होत होता. संध्याछायेचा हा काळ मनाला हुरहूर लावत होता. कोणी काही बोलले नाही निशब्द शांतता वातावरणाला अजूनच गहिरे करत होती.

आणखी वाचा : सुंदर मी होणार : कोंडा झाला तर…

रात्रीच्या जेवणानंतर मंडळींनी पद्मावती तळ्यावरच तळ ठोकला. कोजागिरीच्या पूर्ण चंद्राचे प्रतिबिंब तळ्यात पडले होते… आणि त्या टिपूर चांदण्यात महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजगड उजळून निघाला होता. प्रिया काकू बोलू लागली, ‘या मातीत आपला केवढा मोठा इतिहास घडला आहे… छत्रपतींचे काही दिवस असेही गेले असतील की महाराज हताश झाले असतील तेव्हा राजवाड्यातून दिसणारा तोरणा त्यांना त्यांच्या स्वराज्याच्या शपथेची आठवण करून देत असेल, आग्र्यावरून जीवाची बाजी लावून सुटलेले महाराज पद्मावतीच्या मंदिरात भेटल्यावर जिजाऊंना काय वाटले असेल? आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं हे उद्गार काढल्यावर याच बालेकिल्ल्यावर महाराजांनी तानाजी मालुसरेंना किती घट्ट मिठी मारली असेल? पुरंदरच्या तहाच्या वेळी महाराजांची मनस्थिती काय असेल आणि सईबाईंचे निधन झाल्यावर राजवाड्यावर कशी शोककळा पसरली असेल? या सगळ्या प्रसंगाचा मूक साक्षीदार… किल्ले राजगड… गडांचा राजा आणि राजांचा गड… महाराजांच्या विजयाच्या, हर्षाच्या, पराक्रमाच्या, अभिमानाच्या, दुःखाच्या क्षणात सामील झालेला राजगड आज आपल्याशी जणू बोलतोय आहे की काय अस वाटतंय.’ तिचे ते शब्द ऐकून सगळ्याच जणी भावुक झाल्या. तो कोजागिरीचा पूर्ण चंद्र आणि त्या चंद्राच्या साक्षीने अनुभवलेले शिवचरित्र गात्र गात्र उजळून टाकत होते.

आणखी वाचा : सुंदर मी होणार- केसांचे सौंदर्य कसे राखाल?

रात्र चढली होती, वेळेचं कोणालाही भान नव्हतं तेंव्हाच “हे हिंदू नृसिंव्हा प्रभो शिवाजी राजा…” शिवकल्याण राजा मधल हे गाणं गौरी गाऊ लागली आणि हळू हळू सुवेळा माचीवर तांबडं फुटू लागले. थोड्यावेळाने कोवळी किरण अंगावर घेत मंडळी सुवेळा माचीवरील नेढ्यावर चढली. काळेश्वरी देवीचं दर्शन घेऊन खूप काही मनात साठवून मंडळी परतीच्या प्रवासाला लागली… चिलखती तटबंदीची संजीवनी माची, सूर्याच्या पहिल्या किरणांनी स्नान करणारी सुवेळा माची, महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा बाले किल्ला, स्वराज्याच्या आनंदात सामील झालेले पद्मावतीचे मंदिर… सारं त्या कोजागिरीच्या चांदण्याने पावन झालेलं आणि आयुष्यभरासाठी मनात कोरलं गेलं.