सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. विविध क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. समाजात सर्व क्षेत्रात मुलं आणि मुली यांना समान दर्जा आहे. पण तरीही काही क्षेत्रात मुलींच्या बाबतीत आजही भेदभाव होताना दिसतो. अनेक तरुणींना त्यांच्या स्वप्नापासून वंचित रहावं लागतं. गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीत महिलांना केंद्रस्थानी ठेवत अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही करताना दिसतात.

२६ ऑगस्ट रोजी महिला समानता दिवस साजरा केला जातो. कायद्याने महिलांना अनेक अधिकार प्रदान केले. त्यातील एक अधिकार म्हणजे मतदान करणे. २६ ऑगस्ट १९२० रोजी पहिल्यांदा महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आणि याच स्मरणार्थ ‘महिला समानता दिवस’ साजरा केला जातो. कायद्याने स्त्री आणि पुरुषांना समान हक्क दिलेले असले, तरी प्रत्यक्ष मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्येही स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करणारे चित्रपट पाहायला मिळत आहेत. अशाच काही चित्रपटांबद्दल आपण जाणून घेऊया…

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Who will give the manifesto of health guarantee for the elderly
वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

मदर इंडिया – बॉलिवूडमध्ये निर्मिती झालेला आणि स्त्रिला केंद्रस्थानी ठेवणारा चित्रपट म्हणून ‘मदर इंडिया’ ओळखला जातो. या चित्रपटात अभिनेत्री नर्गिस यांनी कधीही हार न पत्करणाऱ्या सशक्त गृहिणीचे पात्र साकारले होते. यात ती महिला कशाप्रकारे एकटीच मुलांचा सांभाळ करते, त्यांच्या भविष्यासाठी मेहनत घेते हे दाखवण्यात आले होते. यात नर्गिससोबत सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांच्याही भूमिका आहेत.

लज्जा – या चित्रपटात रेखा, माधुरी दीक्षित, मनीषा कोईरालासारख्या दिग्गज अभिनेत्री एकत्र पाहायला मिळतात. हा चित्रपट पूर्णपणे महिलांच्या समस्येवर आधारित होता. हा चित्रपट पाहताना तो आपल्याच आयुष्यातील एका समस्येवर आहे, असे कटाक्षाने जाणवते. त्यामुळे हा चित्रपट त्यावेळी महिलांमध्ये लोकप्रिय ठरला होता.

छपाक : देशात अनेक महिला अ‍ॅसिड हल्ल्याच्या शिकार होतात. मात्र आजही अ‍ॅसिडच्या विक्रीवर बंदी नाही. ते स्वस्त दरात बाजारात सहज उपलब्ध आहे. परंतु ज्याची काडीमोल किंमत आहे अशा अ‍ॅसिडचे परिणाम किती घातक आहेत हे या चित्रपटातून प्रकर्षाने दाखविण्यात आलं आहे. अ‍ॅसिड हल्ल्याचा त्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम ‘छपाक’मधून सादर करण्यात आला आहे. मेघना गुलजार यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

दामिनी – हा चित्रपट १९९३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सनी देओल, ऋषी कपूर यांसारखे सुपरस्टार असले तरी यातील प्रमुख भूमिका ही अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिची होती. एक महिला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कशाप्रकारे आवाज उठवते आणि इतर महिलांनाही कशी प्रेरणा देते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. यात तुमचे कुटुंबच तुमच्यावर अन्याय करत असेल तर आपण कसा लढा देऊ शकतो, याचाही बोध घेण्यासारखा आहे.

इंग्लिश विंग्लिश : शशी नावाच्या सुखवस्तू गृहिणीची ही कथा. सगळं उत्तम असतं, पण इंग्रजी माध्यमातल्या बुद्धिमान लेकीकडून आणि उच्चशिक्षित पतीकडून तिच्या घरगुती असण्याची, इंग्रजी चांगलं न येण्याची सतत चेष्टा होत असते. त्यांना आपली लाज वाटते हे शशीला जाणवत असतं. तिचा आत्मसन्मान दुखावतो. हा चित्रपट फक्त भाषेच्या मुद्द्याविषयी नाही, तर भाषेच्या सामुदायिक न्यूनगंडाचं माध्यम वापरून एकूणच कुठलाही न्यूनगंड, त्याला सामोरं जाणं आणि तो जिद्दीनं संपवणं हा प्रवास खूप सुंदर पद्धतीनं यातून उलगडतो.

मर्दानी २ : भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. या पुरुष प्रधान संस्कृतीचा देशातील चित्रपट क्षेत्रावरही खोलवर परिणाम झाल्याचं दिसते. अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी २ हा चित्रपट या ठोकळेबाज परंपरेला छेद देणारा आहे. मर्दानी २ मध्ये राणी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका माहिला पोलिस अधिकाऱ्याच्या रुपात दिसली. मुलींना, महिलांना पद्धतशीरपणे लक्ष्य करणाऱ्या बलात्कारी आरोपीला पकडण्यासाठी धडपड करणारी शिवानी शिवाजी रॉय अर्थात राणी मुखर्जी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.

नीरजा : नीरजा हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. नीरजा भानोत ही एक सर्वसाधारण घरातील मुलगी होती. तिच्याकडून जे असामान्य कर्तृत्व घडलं ते कौतुकास पात्र आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नीरजा चित्रपटातून महिलांची ताकद दिसून येते. यात एका हवाई सुंदरीची कहाणी दाखवण्यात आली आहे. ज्यात तिचे अतुलनीय साहस दिसते. तिच्यातील निर्भिडतेने मृत्यूलाही जवळ केले. नीरजा भनोतवर आधारित हा चित्रपट अपहरण झालेल्या विमानाच्या सत्यघटनेवर आधारित आहे.

राजी़ : देशाच्या संरक्षणासाठी पाकिस्तानामध्येही जायला न घाबरणारी एक भारतीय गुप्तहेर. ती पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यासोबत लग्न करते. तिथे जाऊन हेरगिरी करते, हिंमत दाखवते, बलिदान देते, देशाच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तिची तयारी असते. या चित्रपटात महिलेच्या एका वेगवेगळ्या रुपाचे दर्शन होते. एका सत्यघटनेला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर मांडताना थरारक कथानकासोबतच एक प्रेमकहाणीही हळुवरपणे उमलताना दिसते. अर्थात यात कुठेही अतिरंजकता नाही ही बाबही तितकीच खरी.