टीम इंडियाच्या उपांत्यफेरीतील पराभवानंतर ट्विटरकरांनी विराट आणि अनुष्कावर टीकांचा भडीमार करण्यास सुरूवात केल्यानंतर विराटचा माजी संघ सहकारी युवराज त्याच्या समर्थनार्थ धावून आला आहे. उपांत्यफेरीत विराटची निराशाजनक खेळी आणि त्यात स्टेडियमवर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या उपस्थितीमुळे आयते कोलीत हातात मिळाल्याने या दोघांना टीकेचे लक्ष्य केले गेले.
यावर युवराज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले की, एखाद्या निराशाजनक खेळीपेक्षा त्याने ऑस्ट्रेलिया दौऱयात ठोकलेल्या पाच शतकांसाठी विराट चाहत्यांच्या आदरास पात्र आहे. तसेच संघाच्या विजय आणि पराभव या दोन्ही काळात संघासोबत असणाऱया टीम इंडियाच्या सच्च्या चाहत्यांनी विराट आणि अनुष्काच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करायला हवा, असेही युवीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहेत. सोबत विराटचे भवितव्य उज्ज्वल असून आगामी काळात टीम इंडियासाठी तो नक्कीच उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास असल्याचेही तो पुढे म्हणाला.