आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे(आयसीसी) अध्यक्षपद मुस्तफा कमाल यांच्याकडे असूनही रविवारी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे विद्यमान चेअरमन एन.श्रीनिवासन यांनी विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला चषक प्रदान केला. विजेत्या संघाला आयसीसी अध्यक्षच्या हस्ते चषक प्रदान करण्याची प्रथा आहे. परंतु, टीम इंडियाकडून बांगलादेशचा पराभव झाल्यावर मुस्तफा कमाल यांनी वादग्रस्त विधानं केली होती. आयसीसीच्या अध्यक्षांकडून नियमांचे उल्लंघन झाले असून त्यांना विश्वचषक प्रदान करण्याचा मान दिला जाऊ नये, असा दावा श्रीनिवासन यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर विजेत्या संघाला चषक कोण्याच्या हस्ते दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर खुद्द श्रीनिवासन यांच्या हस्तेच ऑस्ट्रेलियाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.