आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली, म्हणूनच आम्ही बाद फेरीत पोहोचलो आहोत. आम्हाला कोणतीही गोष्ट सिद्ध करायची नाही, असे मत बांगलादेशचे प्रशिक्षक चंडिका हातुरसिंघे यांनी व्यक्त केले आहे.
‘‘आम्हाला काहीही सिद्ध करायचे नाही, आम्ही चांगला खेळ करतोय आणि ते आम्हाला माहिती आहे, त्यामुळेच आम्ही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही प्रत्येक सामन्यामध्ये खेळाचा आनंद लुटला आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. पण त्यांच्या गोलंदाजीची सुरुवात कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत,’’ असे हातुरसिंघे म्हणाले.