बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून धावांची बरसात पाहायला मिळेल, असे वाटले होते; पण मार्सिया वादळामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाचीच बरसात या सामन्यात अनुभवायला मिळाली. नाणेफेकही न करता सामना रद्द करण्यात आला असून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे.
या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क पुनरागमन करणार होता; पण पावसामुळे सामनाच होऊ शकला नाही. पावसाचा जोर पाहून स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी ४.४० मिनिटांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी १९७९च्या विश्वचषकामध्ये श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ओव्हल येथील सामना एकही चेंडू न टाकता रद्द ठरवण्यात आला होता.