विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असल्याने चाहत्यांची निराशा झाली. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी मात्र संघाचे कौतुक केले आहे. विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी विलक्षण होती, असे त्यांनी म्हटले आहे.
उपांत्य फेरीत भारतीय संघ पराभूत झाला असला तरी त्यांनी सलग सात सामन्यांमध्ये मिळवलेल्या विजयाचे दालमिया यांनी कौतुक केले आहे. याबाबत ते म्हणाले की, ‘‘विश्वचषकात दमदार कामगिरी केल्याबद्दल मी संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी आदर्शवत खेळाचा नजराणा पेश केला, त्यांनी खेळभावना ध्यानात ठेवत कामगिरी केली आणि करोडो चाहत्यांना आनंद दिला.’’