आज मी नाही, तर तुमच्यातील एक सर्वात जास्त अनुभवी खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर तुमच्यासमोर बोलेल, असे सांगत मानसोपचारतज्ज्ञ पॅडी अपटन यांनी आपली खुर्ची खाली केली. सचिनने आपल्या अनुभवाचे धडे खेळाडूंना दिले. एक आगळी ऊर्जा खेळाडूंमध्ये संचारली. त्यानंतर मोहालीच्या wc09महामुकाबल्यात पाकिस्तानला हरवून मग दिमाखात मुंबई गाठणाऱ्या भारतीय संघाने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. २०११च्या इतिहासाची पाने पालटल्यानंतर आता समोर आहे मेलबर्न. भारत-पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकामधील सहावा सामना म्हणजे महाउत्सुकता, महाथरार लाभलेले हे महायुद्ध. फक्त या वेळी उणीव भासते आहे ती महापराक्रमी सचिन तेंडुलकरची. आतापर्यंतच्या पाच लढतींचे अनेक समान धागे आहेत. यापैकी एक म्हणजे सचिन आणि त्याने तीनदा प्राप्त केलेला सामनावीर पुरस्कार. यापैकी पहिल्या चारही सामन्यांमध्ये भारताकडून जवागल श्रीनाथ खेळला, तर डेव्हिड शेफर्ड हे पंच होते. तसेच २००३चा सेंच्युरियनचा अपवाद वगळता चारही सामन्यांत धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अपयशी ठरला आहे.
१९९२च्या विश्वचषकाची लढत भारत-पाकिस्तान लढत जावेद मियाँदादच्या मर्कटलीलांमुळे सहज आठवते. यष्टिरक्षक किरण मोरेला वेडावून दाखवण्यासाठी त्याने बेडूकउडय़ा मारल्या होत्या. या लढतीत भारताचे २१६ धावांचे माफक आव्हान पेलताना पाकिस्तानचा डाव १७३ धावांत कोसळला. सचिनने नाबाद ५४ धावा आणि एक बळी घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सामन्यानंतर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर कर्णधार इम्रान खानने खेळाडूंना खडे बोल सुनावले. मग पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तानने चक्क जगज्जेतेपद काबीज केले होते. मग १९९६मध्ये बंगळुरूला उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पत्करलेला पराभव पाकिस्तानचे विश्वविजेतेपद राखण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करणारा ठरला. या वेळी नवज्योतसिंग सिद्धूची खेळी भारतासाठी तारणारी ठरली. कर्णधार आमिर सोहेलच्या पाकिस्तानी संघाला या वेळी अंतर्गत यादवीने पोखरले होते. पराभूत पाकिस्तानी खेळाडू मग थेट मायदेशी न जाता काही दिवसांनी स्वगृही परतले. प्रचंड संतापाची लाट पाकिस्तानमध्ये उसळली होती, ती कदाचित खेळाडूंच्या जिवावरसुद्धा बेतली असती.
१९९९मध्ये ओल्ड ट्रॅफर्डला झालेल्या लढतीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. कारण एकीकडे भारत-पाकिस्तान सीमेवर कारगिलची धुमश्चक्री सुरू होती. भारताविरुद्धचा सामना म्हणजे आमच्यासाठी सराव सामना आहे, असे विधान वसिम अक्रमने नाणेफेकीच्या वेळी करण्याचे धारिष्टय़ दाखवले होते. अक्रम काहीतरी भयंकर बोलतोय, अशी समालोचक जेफ बॉयकॉट यांनी त्याची खिल्लीही उडवली होती. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड फॉर्मात होते. मग व्यंकटेश प्रसादने २७ धावांत पाकिस्तानचा निम्मा संघ गारद केला आणि विजयाचा अध्याय लिहिला. या वेळी विश्वचषक जिंकल्याप्रमाणे देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. सीमेवर जवानांनीही भारताचा विजय भांगडा नृत्यावर ठेका घेत साजरा केला. पाकिस्तान मात्र शोकसागरात बुडाला. अनेक नागरिकांनी रात्रीच्या भोजनावर पाणी सोडले, तर काहींनी आपले टीव्ही फोडले. अर्थात सामन्यानंतर सर्वानी अक्रमला टीकेचे लक्ष्य केले. त्या वेळी भारताने सुपर सिक्सपर्यंत मजल मारली. परंतु पाकिस्तानवरचा विजय आणि वडिलांच्या निधनावर मात करून विश्वचषक गाजवणाऱ्या सचिनच्या कर्तृत्वामुळे भारतीय संघ स्वाभिमानाने मायदेशी परतला.
त्यानंतर सेंच्युरियनवर साखळीत हे संघ भिडले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करीत सईद अन्वरच्या शतकाच्या बळावर २७३ धावांचे आव्हान उभे केले. त्या वेळी पाकिस्तान हा सामना जिंकणार असेच सर्वाना वाटत होते. परंतु सचिनच्या झंझावातापुढे हे स्वप्न बेचिराख झाले. अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर, अब्दुल रझाक आणि शाहीद आफ्रिदीसारख्या गोलंदाजांवर सचिनने हल्ला केला. पण दुर्दैवाने ९८ धावांवर शोएबने सचिनच्या खेळीपुढे पूर्णविराम दिल्यामुळे त्याचे शतकाचे स्वप्न अधुरे राहिले. मग २०११च्या विश्वचषकात उपान्त्य फेरीत भारताने पाकिस्तानला २९ धावांनी हरवून मुंबईच्या अंतिम फेरीवर शिक्कामोर्तब केले. आदल्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला, तेव्हा सामना होईल की नाही, हीसुद्धा शंका निर्माण झाली होती. परंतु मोहालीत सचिनने वादळी फलंदाजी करीत ८५ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताने २६० धावा केल्या, तर पाकिस्तानचा संघ २३१ धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यानंतर भारतात दिवाळी साजरी झाली, तर पाकिस्तानात स्मशानशांतता पसरली होती. ‘त्या’ कटू स्मृती आजही पाकिस्तानी खेळाडूंच्या मनामध्ये घर करून आहेत. पाहूया, मेलबर्नवर या कट्टर प्रतिस्पध्र्यापैकी कोण जिंकतेय?