Vat Savitri Purnima 2025 Date Puja Timing: ज्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात, तो वटपौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदा हा सण १० जूनला साजरा केला जाणार आहे. हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केलं जातं.
वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधिनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. चला तर मग जाणून घेऊ, यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजेची शुभ वेळ आणि महत्त्व काय..
वटपौर्णिमा पूजेची शुभ वेळ आणि मुहूर्त
वड पूजा मुहूर्त: सकाळी ८:५२ ते दुपारी २:०५
स्नान आणि दान वेळ: सकाळी ४:०२ ते ४:४२ पर्यंत
चंद्रोदय : संध्याकाळी ६:४५
वटपौर्णिमा व्रताची तारीख – १० जून २०२५, मंगळवार
वटपौर्णिमेची विधीवत पूजा कशी करावी?
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साहित्य – हळद- कुंकू, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, निरांजन, पाच प्रकारची फळं, फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत, हिरव्या बांगड्या
वटपौर्णिमेचा पूजा विधी – सकाळी वटसावित्री व्रताचा संकल्प करावा. सकाळची कामे उरकल्यानंतर सुवासिंनीनी सौभाग्यलंकार परिधान करून देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र जमावं.
वट सावित्री व्रत का साजरा केले जाते?
हिंदू पौराणिक कथेनुसार, या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिचे पती सत्यवानचे प्राण परत आणले होते, त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात.
वट सावित्री व्रताचे महत्त्व
वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात, यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते.