आपल्या प्रत्येकाला पोर्टफोलिओकडून प्रथम अपेक्षा असते ती परताव्याची. कालावधीनुसार आणि गुंतवणूक पर्यायाच्या जोखमीनुसार वेगवेगळे पर्याय गोळा करून आपण पोर्टफोलिओ बांधतो. जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती, कंपन्यांची कामगिरी, येत्या काळातील अंदाजित महागाई, पुरवठा साखळीचे नियोजन, फंड मॅनेजरची पोर्टफोलिओ हाताळायची पद्धत या सर्व गोष्टींचा पोर्टफोलिओवर सतत परिणाम होत असतो. परतावे हे जसे आनंद देणारे असतात तसेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त दुःख नुकसान झालं की होते. कधी हे नुकसान फक्त तात्पुरते किंवा प्रासंगिक असतं, तर कधी-कधी ते प्रत्यक्षसुद्धा होऊ शकतं. नुकसानीत असणारा पोर्टफोलिओ किंवा त्यातील एखादी विशिष्ट गुंतवणूक योग्य आहे की नाही हे वेळीच ठरवणं गरजेचं असतं. कारण गुंतवणूक कालावधीमध्ये नुकसान किती प्रमाणात असावं, यालासुद्धा मर्यादा असतात. त्या मर्यादांच्या पलीकडे जेव्हा पोर्टफोलिओ जातो तेव्हा मुळात अतिशय व्यावहारिक पद्धतीने विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी आजचा हा लेख.

एक सर्वसामान्य गुंतवणूकदार जेव्हा पैसे गुंतवतो, तेव्हा तो फक्त फायद्याची अपेक्षा करतो. अर्थात यात काही चुकीचं नाहीये. परंतु किती फायदा होईल या प्रश्नाबरोबर किती नुकसान होऊ शकेल हा विचार करणारी फार कमी मंडळी असतात. साधारणपणे मागील परतावे बघून आपण गुंतवणूक करतो आणि जेव्हा आपली गुंतवणूक तोट्यात जाते, तेव्हा विचार करतो की आपलं काय चुकलं? आणि बरेच वेळा आपण याचं खापर दुसऱ्यावर (वितरक, सल्लागार, मित्र , इत्यादी!) किंवा अगदी कोणी मिळालं नाही तर शेअर बाजारावर फोडून मोकळे होतो. मागील लेखामध्ये मी एक गोष्ट वाचकांच्या लक्षात आणून दिली होती – नुकसान मर्यादित ठेवा. आजच्या लेखातून आपण नुकसान व्यवस्थापन कसं करायचं हे समजून घेऊया!

नुकसान व्यवस्थापन तीन पद्धतीने करता येतं – नुकसान व्हायच्या आधी म्हणजे प्रतिबंधात्मक (Preventive Loss Management), नुकसान होत असताना म्हणजेच प्रासंगिक (Incidental Loss Management), आणि नुकसान झाल्यानंतर म्हणेजच घटनोत्तर (Post Facto Loss Management).

१. प्रतिबंधात्मक – नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती. गुंतवणुकीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर गुंतवणुकीतून नुकसान होऊ नये म्हणून तिच्याबाबतीत केलेली चौकशी, आपल्या जोखीमक्षमतेनुसार तिचा पोर्टफोलिओमधील ठरवलेला वाटा, वेळोवेळी तिचा मागोवा घेणं आणि सगळं अपेक्षेनुसार सुरू आहे याची खात्री करणं – हे सगळं येतं. एखाद्या शेअरमधल्या गुंतवणुकीचा उदाहरण इथे आपण घेऊ शकतो. शेअर घ्यायच्या आधी त्याचं विशलेषण (Fundamental /Technical) करून मग बाजाराची परिस्थिती, आपलं ऍसेट ऍलोकेशन (Asset Allocation) हे सगळं बघून आपण त्यात गुंतवणूक करतो. मग तो शेअर पुढे कशी कामगिरी करतो किंवा ती कंपनी कशी वाढते हे आपण वेळोवेळी तपासात राहतो. कंपनीचे वार्षिक आणि त्रैमासिक अहवाल वाचतो. त्याही पुढे जाऊन काही जण तर जागतिक पातळीचे विचारसुद्धा करतात. अशा पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून नुकसान होणारच नाही, असं मी इथे अजिबात सांगत नाहीये. परंतु नुकसान व्हायची शक्यता कमी मात्र नक्की होते. या गोष्टीचा सर्वात मोठा फायदा नुकसान झालं तर काय करायचं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सापडतं. एक सजग गुंतवणूकदार नुकसानाला घाबरत नाही, परंतु आपल्या हातात शक्य असलेल्या गोष्टी करून तो नुकसान होणार नाही किंवा झालं तरी कमी होईल ही खबरदारी वेळो-वेळी घेत असतो. विमा कवचसुद्धा याच पद्धतीने काम करतं.

२. प्रासंगिक – सगळ्यांनाच सगळ्याच वेळी नुकसान होणार नाही, असं फारच क्वचित घडतं. साधारणपणे पोर्टफोलिओ म्हटलं की, काही टक्के गुंतवणूक फायद्यात आणि त्याच वेळी काही तोट्यात टक्के गुंतवणूक असू शकते. परंतु तोटा हा कायमस्वरूपी आहे की, तात्पुरता हे तोटा होत असताना लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय कधीकधी तर मुद्दाम तात्पुरता तोटा घेतला जातो की, तो तोटा येत्या काळात नफ्यामध्ये होईल. म्ह्णून तोटा होत असताना त्याचा पुरेपूर पडताळा करून, तो कमी करता येईल का हे पाहावं. इथे आपण स्टॉपलॉसचं उदाहरण घेऊया. शिस्तबद्ध डे ट्रेडिंग करणारे नेहमीच या पद्धतीने आपलं नुकसान कमी करतात. यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःची नुकसान पातळी ठरवून आणि भावनाशून्य होऊन तिचा नियमितपणे वापर केल्याने नक्की तोटा कमी होण्यामध्ये मदत होते. आरोग्य विमा आहे म्हणून कुणी मुद्धाम आजारी पडतं का? किंवा उगीचच उपचाराचा खर्च वाढवतं का? नाही ना, मग गुंतवणुकीच्या बाबतीत नुसतं तिचा तोटा वाढत राहतोय हे बघत बसण्यात मला काही तथ्य वाटत नाही. काही काळ नुकसान सहन करून जर पुढे चांगला फायदा होत असेल तर ते ठीक आहे. परंतु चुकीच्या किमतीला घेतलेला शेअर परत त्याच किमतीवर येईस्तोवर न विकणं, हे जास्त नुकसानदायक असतं. त्यापेक्षा थोडा तोटा सहन करून मिळालेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले तर पोर्टफोलिओचा परतावा हा नक्कीच जास्त होईल.

३. घटनोत्तर – इथे आपण अशा नुकसानाकडे बघतो, ज्याचा आपण अंदाज बांधू शकलो नव्हतो. उदाहरण घ्यायचं तर एका कंपनीच्या रोख्याचं घेऊया. चांगली दर्जेदार कंपनी जेव्हा बाजारात रोखे आणून कर्ज घेते, तेव्हा तिच्या मागील कामगिरी, पुढील धोरणे आणि प्रवर्तकांची हमी इत्यादी गोष्टींचा विचार करून गुंतवणूकदार आपले पैसे तिच्या रोख्यांमध्ये गुंतवतात. परंतु काही कारणास्तव कंपनीला खुप मोठं नुकसान झालं आणि कंपनी बुडीत गेली तर अशा वेळी गुंतवणूकदाराला नंतरच कळतं. काही वेळी कायद्यानुसार कधी कधी पैसे परत मिळतात, परंतु ते कसे, कधी आणि किती मिळणार हे मात्र माहीत नसतं. अशा प्रकारच्या घटनांमुळे आपल्या पोर्टफोलिओला मोठा धक्का बसू नये म्हणून आपण प्रत्येक गुंतवणुकीचं प्रमाण ठरवून त्यानुसार पोर्टफोलिओ बांधतो. तरीही नुकसान झालंच तर त्यातून जे काही मार्ग काढून पैसे परत मिळवता येतील हे बघतो. परंतु या सगळ्यांमध्ये वेळ आणि पैसे दोनीही खर्च होतात.

तोटा झाल्यानंतरसुद्धा तो फायदा करून देतो. इथे मी प्राप्तिकर नियमाची गोष्ट करत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भांडवली तोटा आपला कर कमी करण्यात मदत करतो. तेव्हा गुंतवणूकदाराने कर सल्लागाराच्या मदतीने झालेल्या नुकसानाचा वापर करून, त्याबाबतीत योग्य पद्धतीने आणि मुदतीच्या आत प्राप्तिकर विवरण भरून आपलं कर व्यवस्थापनसुद्धा स्मार्ट करावं.

वरील प्रकारे नुकसान व्यवस्थापन करताना प्रत्येक गुंतवणूदाराने सजग राहणं अपेक्षित आहे. पैसे खिशातून किंवा बँकेतून जायच्या आधी हे सगळं जाणून घेऊन योग्य पद्धतीने ते करणं हीच यशस्वी पोर्टफोलिओ व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे.
तृप्ती राणे (सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.