अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारची भूमिका नकारात्मक असल्याचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केलेला आरोप केंद्र सरकारने सपशेल फेटाळला आहे. तामिळनाडूला केंद्र सरकारकडून पुरेसे अर्थसाहाय्य करण्यात आले असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारने तामिळनाडूला बंदरांच्या विकासासाठी त्याचप्रमाणे न्येवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन आणि तुतिकोरीन औष्णिक महामंडळाच्या क्षमतावाढीसाठी भरीव आर्थिक मदत केली असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यांना असलेले अधिकार काढून घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून पंतप्रधानांना वेळोवेळी पत्र लिहिले असता त्याची केवळ पोचच मिळते, असा आरोप जयललिता यांनी केला होता. राज्याला अधिक वीज उपलब्ध करून देण्यास केंद्राने नकार दिला आहे. त्याचप्रमाणे मुल्लापेरियार धरणाबाबतही केंद्राने नकारात्मक भूमिका घेतली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central reject jayalalitha charge