मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याची तुलना अयोध्येतील बाबरी मशिदीच्या विध्वंसाशी कथितरीत्या केल्यामुळे भारताच्या दौऱ्यावर आलेले पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांना टीकेला सामोरे जावे लागले. मलिक यांनी भारत दौऱ्याच्या सुरुवातीलाच सीमापार दहशतवादासोबत भारतातील अंतर्गत घटनाक्रमावर टिप्पणी करणे दुर्दैवी, आश्चर्यजनक आणि अनावश्यक आहे, अशी टीका भाजप नेते अरुण जेटली यांनी केली.
मलिक यांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या द्विपक्षी मुद्दय़ांवर चर्चा अपेक्षित आहे. पण शुक्रवारी रात्री गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मलिक यांनी २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यासोबत २० वर्षांंपूर्वी झालेल्या बाबरी विध्वंसाचाही उल्लेख केला आणि भारतीय प्रसिद्धी माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोडच उठली. दहशतवादाचा निषेध करताना मुंबईवर दुसऱ्यांदा दहशतवादी हल्लाही होऊ नये, तसेच बाबरी विध्वंसाची पुनरावृत्तीही घडू नये, असे विधान मलिक यांनी केले होते. त्यामुळे मलिक यांनी मुंबईवरील हल्ल्याची तुलना बाबरी विध्वंसाशी केल्याची टीका झाली आणि भारताशी आक्रमकपणे वाटाघाटी करण्यासाठी आलेल्या मलिक यांना बचावाचा पवित्रा घ्यावा लागला. आपण २६/११ ची तुलना बाबरी विध्वंसाशी कधीही केली नाही. हा अंतर्गत मुद्दा असून त्यात कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा आपला प्रयत्न नसल्याचे मलिक यांना स्पष्ट करावे लागले. मलिक यांनी भारतीय प्रसिद्धी माध्यमांविषयीही नापसंती व्यक्त केली.
भाजपला आयती संधी
‘सईदबद्दल आम्हाला प्रेम नाही!’