UPSC: स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनी भारतीय संस्कृतीतील हत्ती आणि घोड्याचे महत्त्व सांगितले आहे.

भारतीय संस्कृतीला आकार देण्यात हत्ती आणि घोड्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हत्ती हा प्राणी मूळचा भारतीय, तर घोडा हा परकीय.

भारतीय संस्कृतीतील हत्ती

भारतीय संस्कृतीत हत्तीला देवत्त्व प्राप्त झाले आहे. हत्तीला भारतातील उष्णकटिबंधीय हवामान आवडते. म्हणूनच तो भारतीय उष्णकटिबंधीय वनांमध्ये मुक्तसंचार करताना आढळतो. याच वनांमध्ये तो दिवसाचे १६ तास चरत असतो. याच वन्यजीवाने मानवी उत्क्रांतीच्या प्रारंभिक कालखंडात गंगेच्या परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या परिसरातील मानवी वस्तीला धोका निर्माण झाला. परिणामी मानवाने या वन्य प्राण्याला पाळीव करण्याचे काम केले. या पाळीव झालेल्या प्राण्याने माणसासाठी वनातून जाणारा मार्ग तयार करण्यास मदत केली. म्हणूनच, या मदत करणाऱ्या प्राण्याला विघ्नहरण करणाऱ्या देवतेच्या रूपात पुजण्याची परंपरा सुरु झाली.

हत्ती हा प्राणी सहजच डोंगरमाथे ओलांडून जाऊ शकत होता. नदीच्या पाण्यातून सहजच पोहून जाऊ शकत होता. म्हणून काळाच्या ओघात हा प्राणी व्यापाऱ्यांचा आवडता ठरला. तो व्यापारी माल वाहून नेणारा प्रमुख प्राणी होता. आधी देवी लक्ष्मीबरॊबर (प्रथम बौद्ध स्तूपाच्या रेलिंगमध्ये दिसला) नंतर तो इंद्राच्या वेगवेगळ्या रूपात आणि त्याचे गुरु बृहस्पतींबरोबर दिसला.

हत्ती म्हणजे सामर्थ्य आणि अध्यात्माचे प्रतीक

भारतीय राजे हत्तीचा वापर सैन्यात करत असतं. मुळातच नेतृत्त्वगुण असलेला हत्ती सैन्य कळपाचे नेतृत्त्व करू शकत असे. त्याच्यात गावं उध्वस्त करण्याचं सामर्थ्य होतं. राजाला कोणी विरोध केला, खंडणी किंवा कर भरण्यास नकार दिला, तर हत्ती त्याला चिरडून टाकू शकत होता. त्यामुळे हत्तीला शाही प्राण्याचे स्वरूप प्राप्त झाले. तो राजा आणि व्यापारी अशा दोघांचाही आवडता प्राणी ठरला. तो भारतीय संस्कृतीत शक्ती आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून उदयास आला.

मातांना झाले होते स्वप्नदर्शन

बौद्ध आणि जैन धर्मात हत्तीला महत्त्वाचे स्थान आहे. जैन आणि बौद्ध ऋषी आणि भिक्षूंच्या मातांना अनेक दात, सोंड असलेल्या पांढऱ्या रंगाच्या हत्तीचे स्वप्नदर्शन झाले होते. म्हणूनच हत्ती या प्राण्याला भारतीय संस्कृतीत आगळे वेगळे अध्यात्मिक महत्त्व आहे.

हत्तीला बंदिवासात प्रजनन करता येत नाही. म्हणूनच भारतातील हत्तींची संख्या टिकवून ठेवण्यात जंगली हत्ती महत्त्वाची भूमिका बजावतो. भारतातील प्रत्येक राजाने हत्तीला नेहमीच शाही प्राणी म्हणून पाहिले आहे. हे केवळ भारतीय राजांपुरताच मर्यादित नव्हते, तर, मध्य आशियातून आलेल्या मुघलांनी हत्तीचा शाही दर्जा अबाधित ठेवला. मुघल शासकांनीही युद्धात हत्तीवरूनच उतरणे पसंद केले. म्हणूनच भारतीय संस्कृती हत्तीला युद्धासाठी उत्कृष्ट आणि शाही प्राणी मानते. परंतु, भारताबाहेरील लोकांसाठी मात्र हत्ती हा clumsy, नियंत्रण ठेवण्यास कठीण आणि भयंकर प्राणी होता. हा प्राणी चिडला की त्याच्या स्वतःच्या सैन्यालाही मारू शकतो. किंबहुना त्याच्यावर बसलेला राजा हा सहजच शत्रूच्या बाणांचा बळी ठरे. म्हणूनच तो भारताबाहेरील लोकांना अप्रिय होता.

घोड्याचे भारतातील आगमन

भारताबाहेरील लोकांनी घोड्याला भारतात आणले. सर्वात जुने घोडे लहान होते आणि ते स्पोक-व्हील रथ ओढण्यासाठी वापरले जात होते. या घोड्यांचे वर्णन ऋग्वेद, रामायण आणि महाभारतात करण्यात आले आहे. राम-रावण युद्धात रामाकडे रथ नव्हता. म्हणून इंद्राने त्याचा घोडा असलेला रथ रामाच्या मदतीला पाठवला. बरोबर आपला सारथी माताली यालाही पाठवले.

महाभारतात श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी आहे. घोड्याने ओढलेल्या स्पोक-व्हील रथावर धनुर्धारी आणि सारथी ही संकल्पना इसवी सनपूर्व १५०० या कालखंडात युरेशियन गवताळ प्रदेशातून इजिप्त, भारत आणि चीनमध्ये पसरली. नंतरच्या कालखंडात घोडेस्वार दिसतात. त्यांच्या प्रतिमा आपल्याला सांची आणि भारहुतच्या स्तुपावर आढळतात. घोडेस्वार अलेक्झांडरच्या सैन्याबरोबर भारतात आले होते, यात काही शंका नाही. या प्रतिमांमध्ये आपल्याला खोगीर (saddle) किंवा रकाब (stirrup) दिसत नाहीत. त्याकाळी toe-stirrup होते. ते कदाचित भारतात निर्माण झाले असावे, असे मानले जाते.

भारहूत आणि सांची या स्तूपांवर आढळणाऱ्या घोडेस्वारांच्या प्रतिमांमुळे भारतात त्यावेळी सिथियन, पार्थियन, कुषाण किंबहुना हुन यांचे अस्तित्त्व असल्याचे समजते. हे परकीय युद्धात पारंगत होते. सूर्य हा देव रथावर स्वार असल्याचे दर्शवण्यात येते, सूर्याचा मुलगा रेवन्त हा रथावर स्वार होऊन शिकारीसाठी जातो. हे दोन्ही देव सध्या राजस्थानमध्ये प्रसिद्ध आहेत.

इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात खोगीर (Saddle) आणि रकाब (stirrup) यांचा शोध चीनमध्ये लागला. नंतरच्या कालखंडात हे तंत्रज्ञान मुस्लीम सरदारांबरोबर भारतात आले. तुर्क आणि अफगाण हे लाकडी खोगीर (Saddle) आणि रकाब (stirrup)घेऊन भारतात आले होते. मुळातच धनुर्विद्येत पारंगत असलेल्या मुघलांना या तंत्रज्ञानामुळे लष्करी आघाडी मिळाली. हे घोडेस्वार म्हणजेच सल्तनत आणि मुघल साम्राज्याचे सरदार होते आणि याच कौशल्याच्या जोरावर त्यांनी ग्रामीण भागांवर सहज नियंत्रण मिळवलं.

रथ, देव आणि बुद्धिबळ

भारतातही घोडेस्वारीचा इतिहास फक्त एक हजार वर्षच प्राचीन आहे. भारतातील घोडेस्वारीची सुरुवात गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, तिबेट आणि पंजाब यांसारख्या तुलनेने कोरड्या प्रदेशात झाली. त्यामुळे या प्रदेशात घोडेस्वारी करणाऱ्या देवांचा जन्म झाला. राजपूत आणि गुजर समुदायातील देवनारायण, तेजाजी, पाबुजी आणि गोगा पीर आणि मराठ्यांचा खंडोबा हे घोड्यांवर स्वार झालेले देव प्रसिद्ध आहेत. उत्तरखंडातील गोलू-देव आणि बंगालमधील धर्म-ठाकूर यांना टेराकोटाचे म्हणजे मातीचे घोडे अर्पण केले जातात. घोड्यावर स्वार झालेला कल्की हा वैष्णव धर्मशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. घोड्याचे शीर्ष असलेल्या विष्णूची पूजा हयग्रीव म्हणून केली जाते. हयग्रीव हा ज्ञानाचा स्रोत आहे. तो वेद चोरणाऱ्या अश्वमुखी राक्षसाला पराभूत करतो.

गजमुखी गणेश हा समृद्धी आणि समाधानाशी संबंधित आहे. तो शिवाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करतो. तर, तिबेटमध्ये आणि भारताबाहेरील इतर भागांमध्ये गजमुखी यक्षाला राक्षसाच्या स्वरूपात पाहिले जाते. तो रानटी आणि वश होण्यास कठीण असल्याने त्याला नियंत्रणात ठेवणे आवश्यक मानले जाते.

हत्ती आणि घोडा हे नव्या संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात हे समजून घेणं आवश्यक आहे. बुद्धिबळाच्या खेळातही घोडा आणि हत्ती राजच्या सामर्थ्याची प्रतिकं आहेत. हा खेळ भारतात म्हणजे हत्तींच्या देशात तयार झाला होता आणि नंतर सुमारे इ.स. ६०० च्या सुमारास अरबांच्या माध्यमातून युरोपात पोहोचला.