डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नेते मंत्रिपद मिळवितात. पण आंबेडकरवादी मंत्र्यांनी पांढरी नव्हे तर, निळी टोपी घालावी, असे आवाहन राज्यमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. येथे आयोजित अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. निळी टोपी घालणे हा आपल्यासाठी अस्मितेचा प्रश्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत संमेलनाच्या समारोपास आ. शिरीष चौधरी, डॉ. कृष्णा किरवले, डॉ. गंगाधर पानतावणे, कवी फ. मु. शिंदे आदी उपस्थित होते. अस्मितादर्श हा आपला स्वाभिमान आहे. अशा चळवळीत फुले-आंबेडकरी चळवळीचा जमाखर्च मांडला जातो. परिवर्तनाच्या काळात आपण आपली पावले कोणत्या दिशेने टाकावीत यासाठी संमेलन मार्गदर्शकच ठरते, असेही डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. संमेलनात आठ ठराव संमत करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे, डॉ. आंबेडकर यांच्या इंग्रजी साहित्याचा मराठीतून अनुवाद करावा, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, महाविहारात अन्य धर्मियांकडून करण्यात येणाऱ्या कर्मकांडावर पूर्णपणे बंदी घालावी, केंद्र सरकारने तत्वत:  मान्य केलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सहा डिसेंबरच्या आत ताब्यात द्यावी, केंद्र सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय बौद्ध विहार निर्माण करावा, सरकारने दलित व आंबेडकरवादी वृद्ध कलाकारांना मानधन द्यावे, आंबेडकरी चळवळीतील वृद्ध कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे भीमसैनिक अशी मान्यता देऊन वार्षिक मानधन द्यावे, अजिंठा डोंगरावर भगवान बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, असे हे ठराव आहेत.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkar vadi ministers should be were blue capsays dr nitin raut