मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटामध्ये चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रकमधून प्रवास करीत असलेली एक महिला व तिचा मुलगा यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.
लोखंडी सळ्या घेऊन हा ट्रक नाशिकहून मुंबईकडे येत होता. तो कसारा घाटात येताच चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि भरवेगात असलेला हा ट्रक रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या कुंपणावर जाऊन आदळला. त्यात ट्रकचालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात एक महिला आणि तिच्या मुलाचा समावेश असून, ते इगतपुरी येथील पिंपळगावातील रहिवासी आहेत. निवास घाडगे (३५, रा. सांगली), चांगुराम पाटोळे (४५, रा. नाशिक), संजय जोशी (३०, रा. इगतपुरी), भीमाबाई जोशी (५५, रा. इगतपुरी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याबाबत कसारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास शेंडे पुढील तपास करीत आहेत. या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gruesome accident in kasara killed 4 including son and mother