केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राज्यातील रत्नागिरी ते नागपूर या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी तरतूद करून अधिसूचना जारी केली आहे. या तरतुदीमुळे कोकण ते विदर्भ असा थेट प्रवास करणे सुलभ होणार आहे. या बरोबरच सिन्नर-शिर्डी ते नगर हा रस्ताही राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचा क्रमांक १६० आहे. महाराष्ट्राच्या रस्ते विकासात या दोन्ही मार्गामुळे चांगलीच भर पडणार आहे. गेल्या २३ मार्चला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री सी. पी. जोशी यांनी हा अध्यादेश काढला.
रत्नागिरी ते नागपूर महामार्ग व्हावा या साठी गेल्या दहा वर्षांपासून दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. आपल्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी हा राज्य महामार्ग घोषित केला व रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लावले. कोकण ते विदर्भ जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा, ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे या कामासाठी त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे किमान सहा वेळा पाठपुरावा केला होता. दुर्दैवाने ते हयात असताना या महामार्गाची घोषणा होऊ शकली नसली, तरी त्यांच्या निधनानंतर वर्षभरातच याची अंमलबजावणी होते आहे. विलासरावांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी हा महामार्ग लवकर व्हावा, या साठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री सी. पी. जोशी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
तुळजापूर – बुटीबोरी पहिला टप्पा  
रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या अध्यादेशानुसार रत्नागिरी- नागपूर या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले आहे. या नवीन राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक ३६१ असा आहे. पहिल्या टप्प्यात तुळजापूर-लातूर-अहमदपूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-बुटीबोरी एमआयडीसी नागपूर असा राहणार आहे. दुसरा मार्ग क्रमांक १६६ हा रत्नागिरी- टिंक-पाली-कोल्हापूर-सांगोला-सोलापूपर्यंत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nhai construct natinonal highway from ratnagiri to nagpur