देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांचा विरोध करत साहित्यिकांपाठोपाठ चित्रपट दिग्दर्शकांनीही पुरस्कार परत करण्यास सुरूवात केली असताना त्यावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सडकून टीका केली आहे. पुरस्कार परत करणाऱयांचा उल्लेख अनुपम खेर यांनी ‘पुरस्कारवापसी गँग’ असा केला आहे. या पुरस्कारवापसी गँगने केवळ सरकारचाच नाही तर परिक्षक तसेच ज्या प्रेक्षकांनी यांच्या चित्रपटांना यशाच्या शिखरावर नेलं त्या सगळ्यांचाच अपमान केला आहे, अशी टीकात्मक ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे. तर, चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनीही अनुपम खेर यांच्या सुरात सूर मिसळून राष्ट्रीय पुरस्कार परत करणे म्हणजे त्या पुरस्काराचा अपमान करण्यासारखे आहे, असे म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील असहिष्णू वातावारणाचा निषेध म्हणून लेखक आणि कलाकारांकडून सुरू असणाऱ्या ‘पुरस्कार वापसी’ आंदोलनात आता शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. देशातील बुद्धिप्रामाण्यावाद, तर्क आणि विज्ञानाच्या सरकारी गळचेपीचा निषेध म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांनी त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार सरकारला परत करण्याची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher madhur bhandarkar paresh rawal slams filmmakers for returning awards