Sabeer Bhatia post on Air India Plane Crash: अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात हा दशकभरातील सर्वात मोठा विमान अपघात असल्याचे मानले जाते. या अपघातानंतर संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र भारतीय वंशाचे कोट्यधीश, हॉटमेलचे सह-संस्थापक साबीर भाटिया यांनी मात्र एक्सवर विमान अपघाताबद्दल असंवेदनशील टिप्पणी केली असल्याचा आरोप केला जात आहे. गुरुवारी दुपारी २४२ प्रवासी असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. ज्यात २४१ प्रवासी मृत्यूमुखी पडले होते.
साबिर भाटिया यांची भारताविरोधात पोस्ट करण्याची ही पहिली वेळ नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी भारतावर टीका करणारी पोस्ट केली होती. “देशातील ४१ कोटी लोक दिवसाला २६० रुपयांमध्ये गुजराण करत असल्याचे म्हटले होते. तरीही भारताला जगातील चौथी अर्थव्यवस्था म्हणवून घेण्यात कसलीच लाज वाटत नाही”, अशी पोस्ट त्यांनी केली होती.
या अपघातानंतर भाटिया यांनी एक्सवर पोस्ट केली होती. त्यात ते म्हणाले, “जगातील चौथ्या क्रमाकांची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशात प्रणालीमधील बिघाडामुळे विमान अपघात होत असतील, यावर तुमचा विश्वास बसेल का? देश महान कसा बनतो, याबद्दल आता प्रश्न विचारण्याची गरज आहे.”
साबिर भाटिया यांच्या या पोस्टला जवळपास वीस लाख लोकांनी पाहिले आहे. तर त्यावर ३६०० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. राष्ट्रीय आपत्तीचे राजकारण केल्याबद्दल अनेकांनी व्यावसायिक भाटिया यांच्यावर टीका केली आहे.
युजर्सनी काय टीका केली?
सोशल मीडिया युजर्सनी भाटिया यांच्या टिप्पणीचा वेळ आणि त्यातील त्यांचा खोचक सूर यावर जोरदार टीका केली. एका युजरने म्हटले की, खूपच असंवेदनशील टिप्पणी. नुकताच अमेरिकेतही विमान अपघात झाला होता. तेव्हाही तुम्ही अशीच प्रतिक्रिया दिली होती का? दुसऱ्या एका युजरने म्हटले की, अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह अद्याप नातेवाईकांना मिळालेले नाहीत. त्यातच तुम्ही देशाची थट्टा उडवत आहात. भारताविरुद्ध तुमचा काय राग आहे?
काही युजर्सनी जगभरात झालेल्या विमान अपघाताचा हवाला दिला. एका युजरने म्हटले अमेरिकेत पोटोमॅक नदीतील विमान अपघाताचा संदर्भ दिला. युजरने म्हटले, तोही प्रणालीतील बिघाड होता ना? की असा दोष फक्त भारतातच होतो?
“विमान अपघात प्रत्येक देशात होत असतो. सांख्यिकीयदृष्ट्या विमान प्रवास अजूनही सर्वात सुरक्षित असा वाहतुकीचा मार्ग आहे. तुम्ही टिप्पणी अनावश्यक आणि लाजिरवाणी आहे”, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, तुम्ही आता आदर गमावला आहे. राष्ट्रीय आपत्तीचेही तुम्ही राजकारण करत असून तुमचा खरा अजेंडा आता उघड झाला आहे.