या वृत्ताने भांडवली बाजारात कंपनीचा समभागही गेल्या आठ महिन्यात प्रथमच तब्बल ५.१२ टक्क्यांनी वधारला. त्याला सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सवर ८२८.२५ रुपये मूल्य मिळाले. दिवसभरात कंपनीचा समभाग ५.६० टक्क्यांपर्यंत उंचावत होता. यावेळी त्याला ८३२ रुपये असा दिवसाचा सर्वोच्च भाव मिळत होता. दिवसअखेर ५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात स्थिरावलेल्या समभाग मूल्यामुळे कंपनीचे बाजार भांडवलही २.६८ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले. गुंतवणूकदारही यामुळे १३ हजार कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. दिवसभरात कंपनीच्या ६.८१ लाख समभागांचे व्यवहार बाजारात झाले. दोन आठवडय़ापूर्वी ही संख्या निम्मी म्हणजेच ३.२७ लाख समभाग होती. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये इन्फोसिससह रिलायन्स मोठे योगदान देतो. आजच्या कंपनी समभाग वधारणेच्या रुपात सेन्सेक्समधील ३२६ अंश वाढीत रिलायन्सचा हिस्सा तब्बल ८४.२० अंश होता.
रिलायन्सचे वायू क्षेत्रातील उत्पादन सतत घटत होते. पुरेसे वायू उत्खनन होत नसल्याने सध्याच्या वायू उत्पादनाचा प्रती ब्रिटिश वायू युनिट खर्च अधिक असल्याने या विहिरी बंद करणे भाग पडले असते या व्यतिरिक्त कंपनीने पुरेसे वायू उत्पादन न केल्याबद्दल सरकारला २०११-१२ साठी ७.८८ दशलक्ष डॉलर दंड भरला आहे. वायू विहिरीत अती खोल क्षेत्रात नवीन साठा सापडल्यामुळे पुरेसा वायू उपलब्ध असेल. यामुळे २०१५ ची रिलायन्सची मिळकत रु. २/- समभाग वाढणे अपेक्षित आहे.
’ अलोक देशपांडे,
तेल व वायू विश्लेषक, इलेन्ट्रा कॅपिटल.