भारताचा औषध निर्माण, रत्ने व दागिने, चामडे आणि पादत्राणे या क्षेत्राशी संबंधित जागतिक व्यापारातील निर्यात टक्का २०१५ च्या तुलनेत २०२२ मध्ये घसरला आहे, असे थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या (जीटीआरआय) अहवालातून समोर आले आहे. मात्र या कालावधीत इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री, पेट्रोलियम, वाहन सुटे भाग, लोह आणि पोलाद आणि ॲल्युमिनियम उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ष २०२२ मध्ये जागतिक व्यापारात भारताचा वाटा १.८ टक्के होता. तर, २०१५ पर्यंत यंत्रसामग्री आणि विद्युत उपकरणांमध्ये वाटा अनुक्रमे ०.७५ टक्के आणि ०.४ टक्के राहिला होता. तयार कपडे, चामडे, पादत्राणे आणि सागरी उत्पादने यांसारख्या क्षेत्रातील भारताचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा कमी होत आला आहे. निर्यातीतील ही घसरण किमतींच्या समस्येमुळे नसून गुणवत्तेच्या चिंतेमुळे असल्याचे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे सह-संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले. जागतिक व्यापारात इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, मोबाइल फोन आणि विद्युत उपकरणे तसेच यंत्रसामग्री या प्रमुख क्षेत्रांचा वाटा जास्त आणि उलाढाल ६ लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक आहे. भारताचा या क्षेत्रातील निर्यात वाटा हळूहळू सुधारत आहे, असेही श्रीवास्तव म्हणाले.

गुणवत्तेसंबंधी समस्या

भारतीय वस्तूंच्या गुणवत्तेची समस्या केवळ औषधनिर्मितीपुरती मर्यादित नसून त्याचा मत्स्य उत्पादनांवरही परिणाम झाला आहे. अनेक देश मत्स्य उत्पादनांना साल्मोनेलाच्या (एक प्रकारचा बॅक्टेरिया) उपस्थितीमुळे नाकारतात. गुणवत्तेच्या मुद्द्यांमुळे भारतीय चहाच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे, फायटोसॅनिटरी समस्या आणि परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकांचा वापर होत असल्याचे सांगून भारतीय चहाची खेप काही देशांनी रद्द करून माघारी पाठवली आहे. या उद्योगाने बाजारपेठेतील वाटा पुन्हा मिळवण्यासाठी गुणवत्तेची आव्हाने हाताळली पाहिजेत, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचाः २००० ची नोट मागे घेणे हा चलन व्यवस्थापन करण्याचा एक मार्ग; RBIची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती

चीनमधून सक्रिय फार्मास्युटिकल सामग्री (एपीआय) आणि की स्टार्टिंग मटेरियलच्या (केएसएम) आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे. जागतिक व्यापारातील भारताच्या औषधी निर्माण क्षेत्राचा निर्यातीचा हिस्सा २०१५ मधील २.७९ टक्क्यांवरून २०२२ मध्ये २.२५ टक्क्यांपर्यंत घसरला.
हिरे आणि दागिन्यांचा वाटा २०२२ मध्ये ४.७४ टक्क्यांवर घसरला, जो २०१५ मध्ये ७.४७ टक्के होता. त्याचप्रमाणे मत्स्य आणि चामड्याच्या वस्तू उत्पादन निर्यात २०२२ मध्ये अनुक्रमे ४.५२ टक्के आणि २.९२ टक्क्यांवर घसरल्या, जे २०१५ मध्ये अनुक्रमे ४.७७ टक्के आणि ३.६५ टक्के होते.

हेही वाचाः मुकेश अंबानींनी विकत घेतली आणखी एक मोठी कंपनी, चॉकलेट बनवणाऱ्या ‘या’ कंपनीचं केलं अधिग्रहण

दुसरीकडे, जागतिक व्यापारात भारताच्या वाहननिर्मिती आणि सुटे भाग निर्यातीचा वाटा २०१५ मधील १.११ टक्क्यांच्या तुलनेत २०२२ मध्ये १.३२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे पोलाद आणि ॲल्युमिनियम उत्पादनांचा निर्यात हिस्सा २०१५ मधील अनुक्रमे १.९८ टक्के आणि १.६९ टक्क्यांच्या तुलनेत २०२२ मध्ये २.६६ टक्के आणि ३.५५ टक्के वाढला आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India export share in global trade declines decline in pharmaceuticals gems jewellery leather footwear vrd