गायत्री कशेळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवजात बाळाला उत्तम प्रतीचे दूध मिळण्यासाठी आईने थोडय़ा थोडय़ा वेळाने परंतु पौष्टिक आहार घ्यावा. मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. आहारात ताजी फळे व भाज्यांचा समावेश करावा. शारीरिक व्यायाम दररोज करावा. मसालेदार, अतितेलकट पदार्थ टाळावेत. आहारात लसूण, मेथीचे, दाणे, जवस यांचा वापर फायदेशीर ठरतो.

निधी त्या दिवशी खूपच काळजीने सांगायला लागली, ‘‘बाळंतपणानंतर माझं वजन खूपच वाढलं आहे. गर्भावस्थेत वाढतं हे मान्य आहे, पण नंतर काहीही करून कमीच होत नाहीये. मी काय करू? घरचंच जेवण जेवते.’’

निधीसारख्या अनेक स्त्रिया बाळंतपणानंतर ही समस्या घेऊन येतात. त्यांचा एकच प्रश्न असतो, ‘बाळाच्या जन्मानंतर वजन कमी होईल का?’  तर याचं उत्तर ‘होय’ असं आहे. परंतु डाएटच्या नावाखाली कोणताही अघोरी प्रयोग करू नये. कारण बाळाच्या जन्मानंतरचे पहिले सहा महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. बाळ पहिले सहा महिने पूर्णत: मातेच्या दुधावरच अवलंबून असतं. त्यामुळे आई जे काही खाईल, त्यातून मिळणारे पौष्टिक अन्नघटक बाळाला मिळतात. त्यामुळे निधीसारख्या पटापटा वजन कमी करणाऱ्या सर्व स्त्रियांना हे पटवून देणं खूप गरजेचं आहे, की चुकीच्या पद्धतीने किंवा कडक डाएट केल्याने आईचे दूध कमी होऊन त्याचा परिणाम म्हणजे बाळाला पुरेसे व पौष्टिक दूध मिळत नाही. निधीची संपूर्ण जीवनाची, खाण्याची जीवनशैली बघता असे आढळून आले की तिने भरपूर तूप-स्निग्ध पदार्थ, अतिगोड पदार्थ खाल्ले आहेत. शारीरिक व्यायाम मात्र अजिबातच नाही. त्यामुळे तिच्या आहारात प्रथिने, कॅल्शियम, इतर अन्नघटकांची कमतरता दिसून येते.

खरं तर या काळात अतिगोड पदार्थ टाळलेले बरे. अतिगोड पदार्थ लाडू यामधून साखर, मध, गूळ या रूपात भरपूर उष्मांक पोटात जातात. त्याचा परिणाम म्हणजे ‘वजनवाढ’. बघा ना, एक लाडू करताना आपण त्यात किती प्रमाणात साखर घालतो, वर त्यात घालतो ते तूप तर वेगळेच! असे दिवसातून ३-४ लाडू खाल्ले तर मग वजन वाढणारच. त्यात गर्भधारणेनंतर शारीरिक हालचाली किंवा व्यायाम पुरेसा केला नाही तर वजन झपाटय़ाने वाढते. आणि निधीने हेच सांगितले. सकाळी, दुपारी, संध्याकाळी १-१ लाडू असे ३ लाडू ती दिवसाला खात होती. याऐवजी गर्भधारणेनंतर आळीव, खसखस यांची विनासाखर खीर घेतली तर जास्त सोयीस्कर. आहारात सुका मेवादेखील घेऊ शकता. ‘शतावरी’ दुधातून पिण्यास दिल्यास त्यामुळेदेखील आईचे दूध वाढण्यास नक्कीच मदत होते.

बऱ्याचदा उत्तर भारतातील लोकांच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये बाळंतपणानंतर आईला कित्येक महिने फक्त दलिया, दूध, लापशी, खीर खाण्यास देतात. बाकीचे सर्व आहारातून वर्ज्य . ग्रामीण भागातसुद्धा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती + वरण किंवा भाकरी दूध इतकेच काही महिने खाण्यास देतात. भात खाल्ल्यानं आईला त्रास होतो. फळांमुळे बाळाला पोटदुखी वा जुलाब होतात. भाज्यांमुळे बाळाला सर्दी – खोकला होईल अशा अनेक गैरसमजुती असतात. परंतु या होणाऱ्या आईने तंतुमय पदार्थ खाल्ले नाही तर तिला अपचन, अ‍ॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारखा त्रास होतो.

शस्त्रक्रियेद्वारे केलेल्या प्रसूती (सिझेरियन)मध्ये हळू हळू पेय पदार्थ, मग मऊ अन्न आणि दुसऱ्या दिवशीपासून नेहमीचे अन्न सुरू करतात. नॉर्मल प्रसूतीनंतर लगेचच संपूर्ण अन्न खायची परवानगी असते. अशा वेळी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. फळे, भाज्यांमधून अ, ब, क जीवनसत्वं मिळतात जे बाळाला आईच्या दुधातून मिळतात. फळांचा रस देण्याऐवजी अख्खी फळे देणे जास्त महत्त्वाचे आहे. फळांचा रस काढताना अनेक अन्नघटकांचा ऱ्हास होतो. फ्रिजमधील, थंडगार व शिळे अन्न टाळावे. ताजे व गरम जेवण या आईच्या आरोग्यास उत्तम.

स्तन्यदा मातांनी मदा, बेकरी पदार्थ, चायनीज पदार्थ टाळावे. बऱ्याचदा कृत्रिम रंग, प्रिझर्वेटिवमुळे आईच्या व बाळाच्या आरोग्याला धोका उद्भवतो. बाळाला उत्तमप्रतिचे दूध मिळण्यासाठी आईने थोडय़ा थोडय़ा वेळाने पौष्टिक आहार घ्यावा. मुबलक प्रमाणात पाणी प्यावे. आहारात ताजी फळे व भाज्यांचा समावेश करावा. शारीरिक व्यायाम दररोज करावा. मसालेदार, अतितेलकट पदार्थ टाळावे. आहारात लसूण, मेथीचे, दाणे, जवस यांचा वापर केल्याने उत्तम दर्जाचे दूध बाळाला मिळते. आईला सर्दी-खोकला झाला तर बाळाला होण्याची शक्यता असते. आईने फळं खाल्ल्याने बाळाला कधीही सर्दी-खोकला होत नाही. जितके दिवस आई बाळाला पाजते तितके दिवस आईने संतुलित व पौष्टिक आहारच घ्यावा. आईच्या दुधामध्ये उत्तमप्रतिचे उष्मांक, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्वे असतात. त्याने बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तसेच संप्रेरकांची पातळी उत्तम राखण्यास मदत होते. अनेक संशोधनातून असेही सिद्ध झाले आहे, की स्तन्यपान केल्याने बाळाला पुढे जाऊन मधुमेह, हृदयविकार व कर्करोगाचा धोका कमी राहतो, तसेच स्तन्यपानामुळे आईला कर्करोगाचा धोका कमी राहतो.

मातेच्या दुधाचे महत्त्व 

बाळ जन्माला आल्यानंतर काही काळ पूर्णत: आईच्या दुधावर अवलंबून असते. म्हणूनच त्याच्या मातेसाठी आहाराचे महत्त्व खूप आहे. सशक्त माता दिवसाला साधारण ७०० मिलीलिटर – १००० मिलीलिटर दूध बाळाला पाजू शकते म्हणूनच आईने पौष्टिक आहार घेतला तर ती बाळाला उत्तम प्रतीचे दूध पाजू शकते.  ज्यावेळी स्त्रीला गर्भधारणा होते तेव्हाच निसर्ग तिच्या शरीरात व मनामध्ये बदल घडवीत असतो. त्यातूनच त्या नवीन जिवाच्या पोषणाची तरतूद होते. सर्वसाधारणपणे गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून स्तनामध्ये वाढ होते. दूध स्रवणाऱ्या ग्रंथी त्यांचे कार्य करू लागतात. प्रसूतीनंतर मातेला जे दूध येते त्याला ‘कोलोस्ट्रम’ म्हणतात. हे कोलोस्ट्रम प्रसूतीनंतर पहिले ७ दिवस येतं. ते अत्यंत पौष्टिक मानलं जातं. दिसायला ते पिवळसर पण घट्ट असते. यात स्निग्ध पदार्थ कमी असून प्रथिने जास्त असतात. त्यामधून मिळणाऱ्या घटकांमुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. ज्या बाळाला कोलोस्ट्रम मिळत नाही त्या बाळाला वारंवार सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, जंतुसंसर्ग, रोग वाढण्याची शक्यता असते. तसेच भविष्यकाळात उंची व वजन वाढण्यास त्रास होतो. ७ दिवसांनंतर येणाऱ्या मातेच्या दुधाला ‘फोर मिल्क’ म्हणतात. हे थोडेसे पातळ व पांढरे असते. या दुधामुळे बाळाची तहान भागण्यास मदत होते. त्यानंतर स्निग्ध पदार्थ जास्त असलेले दूध म्हणजे ‘हाइन्ड मिल्क.’ त्याने बाळाची भूक भागते.

मातेच्या १०० मिलीलिटर दुधातून मिळणारी पोषणद्रव्ये –

उष्मांक – ७० , प्रथिने -१.०७ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ – ४.२ ग्रॅम ,  कॅल्शियम  -३५ मिलीग्रॅम, झिंक –  २९५ मिलीग्रॅम

स्तन्यपानामुळे आई व बाळाचे नाते अधिक घट्ट होत जाते. त्यामुळेच आईचे दूध हे बाळासाठी अमृतच आहे.

gkashelkar@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarvkash aahar article by gayatri kheschalkar