बांगलादेशमधील हिंसाचारात आतापर्यंत बळी पडलेल्यांची संख्या ४९ झाली आहे. शनिवारी झालेल्या हिंसाचारात दोन लहान मुलांसह तीन जण ठार झाले. बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धातील गुन्ह्य़ांप्रकरणी जमात-ए-इस्लामीच्या उच्चपदस्थ नेत्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आल्यानंतर बांगलादेशमध्ये गेल्या तीन दिवसांपासून हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे.
चितगाँव येथे पोलिसांनी जमात-ए-इस्लामीच्या निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. सतकानिया विभागात जमात, शिबीर आणि पोलिसांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यामध्ये एका लहान मुलासह दोन जण ठार झाले, तर जलढाका विभागात संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतिकल इस्लाम हा १५ वर्षांचा मुलगा ठार झाला.
हिंसाचाराचा उद्रेक शांत होण्याची लक्षणे दिसत नसल्याने निमलष्करी सीमारक्षक तैनात करण्यात आले असून देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने गुरुवारी जमात-ए-इस्लामीचा नेता दिलावर हुसेन सइदी याला फाशीची शिक्षा ठोठाविल्यानंतर बांगलादेशात हिंसाचाराचा उद्रेक झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 49 killed in bangladesh violence