भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने व्यावसायिक स्पर्धात्मकतेला मारक अशी पावले उचलल्यामुळे मंडळाला ५२ कोटी २४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. व्यवसायातील प्रथांच्या – धोरणांच्या योग्यायोग्यतेबाबत निर्णय घेणाऱ्या ‘काँपीटिशन कमिशन’ अर्थात स्पर्धा आयोगाने हा निर्णय दिला आहे.
नोव्हेंबर २०१२ मध्ये दिल्लीतील उद्योजक सुरींदर सिंग बार्मी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार केली होती. आयपीएल आणि मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मालिकांबाबत बार्मी यांनी काही आक्षेप नोंदविले होते. यावर निर्णय देताना आयोगाने, मंडळाने आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून प्रचंड नफा कमावला असल्याचे निरीक्षण नोंदविले. तसेच, भारतात क्रिकेटच्या स्पर्धा भरविण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाला कोणताही स्पर्धक नसल्याचे किंवा स्पर्धक निर्माणही होऊ न देण्याचे मंडळाचे धोरण असल्याचे मत आयोगाने व्यक्त केले.  मंडळाच्या या धोरणाने आयपीएलसारखी स्पर्धा भरविण्याची संधी अनेक जणांना नाकारली गेल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच, या धोरणामुळे व्यावसायिक स्पर्धेला बाधा येते, असा आक्षेप आयोगाने घेतला. या ‘वर्चस्व’ राखण्याच्या धोरणाबद्दल शिक्षा म्हणून मंडळाला दंड ठोठावण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 52 crores fine to bcci