India Announces Reopening Of 32 Airports Shut Due to Conflict : भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर गेल्या आठवड्यात देशभरातील काही विमानतळे बंद करण्यात आली होती. मात्र, ही बंदी आता उठवली असून नियमित नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारताने १५ मेपर्यंत पहाटे ५.२९ वाजपेर्यंत ३२ विमानतळे तात्पुरती बंद ठेवण्याची घोषणा केली होती, असं भारताच्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जारी केलेल्या नोटिस टू एअरमनमध्ये (NOTAMs) सांगितले होते. मात्र, सोमवारी सकाळी तात्काळ प्रभावाने हे NOTAM रद्द करण्यात आले आहेत आणि लवकरच विमानतळांवरून नियमित उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

“१५ मे २०२५ रोजी सकाळी ०५:२९ वाजेपर्यंत ३२ विमानतळे नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी तात्पुरती बंद ठेवण्याची सूचना जारी करण्यात आली आहे. ही विमानतळे आता तात्काळ प्रभावाने नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी उपलब्ध आहेत असे कळविण्यात येते. प्रवाशांनी एअरलाइन्सशी थेट विमानाची स्थिती तपासावी आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइनच्या वेबसाइटचे निरीक्षण करावे”, असं एअरलाइन्स प्राधिकरणाने (एएआय) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याकरता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून ७ मे रोजी पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नवी दिल्लीने नागरी हवाई वाहतुकीला संभाव्य हानीपासून दूर ठेवण्याकरता शनिवारी पहाटेपासून भारत-पाकिस्तान सीमेजवलील किंवा प्रमुख भारतीय हवाई दलाच्या तळांवर असलेल्या सुमारे २५ विमानतळांना बंद ठेवण्याची घोषणा केली. दरम्यान, दिवसेंदिवस तणाव वाढत गेल्याने ३२ विमानतळांवरील उड्डाणे १५ मेपर्यंत स्थगित केली गेली.

प्रभावित विमानतळांमध्ये श्रीनगर, जम्मू , लेह, अमृतसर, चंदीगड , अंबाला, लुधियाना , जोधपूर, बिकानेर, जैसलमेर, उत्तरलाई, राजकोट, भुज, जामनगर, धर्मशाळा, बठिंडा, पटियाला, पठाणकोट, शिमला , किशनगड, हिंडन, पोरबंदर, मुंद्रा आणि कांडला यांचा समावेश होता. काही विमानतळ वगळता, यापैकी बहुतेक विमानतळ संरक्षण विमानतळांवर आहेत, तर काही विमानतळांवर दिवसाला मोजक्याच व्यावसायिक उड्डाणे होतात. गेल्या काही दिवसांपासून, दिल्लीच्या उत्तरेस आणि राजस्थान आणि गुजरातच्या बहुतेक भागात, जिथे भारत-पाकिस्तान सीमेजवळील काही संवेदनशील विमानतळे आणि प्रमुख भारतीय हवाई दलाचे स्टेशन आहेत, तेथे जवळजवळ कोणतीही नागरी विमानांची हालचाल झालेली नाही.

इंडिगोने काय म्हटलं?

“सरकारच्या नवीनतम निर्देशांनुसार, विमानतळे ऑपरेशनसाठी खुली आहेत. आम्ही पूर्वी बंद केलेल्या मार्गांवर हळूहळू ऑपरेशन्स सुरू करू. सेवा हळूहळू सामान्य होत असताना, काही विलंब आणि शेवटच्या क्षणी समायोजन होण्याची शक्यता आहे. आमचे पथक सुरळीत ऑपरेशन्स पुनर्संचयित करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत असताना आम्ही तुमच्या संयमाची आणि समजुतीची मनापासून प्रशंसा करतो”, असं भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने म्हटलं आहे.

पाकिस्तानशी झालेल्या संघर्षामुळे उत्तर आणि पश्चिम भारतातील विमानतळे बंद पडल्यामुळे दररोज ३०० हून अधिक उड्डाणे रद्द होत असल्याचे उद्योग सूत्रांनी सांगितले. ही विमानतळे बंद पडल्यामुळे देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या दररोज १६० हून अधिक उड्डाणे रद्द होत आहेत.