Bengaluru Crime : जय श्रीरामच्या घोषणा न दिल्याने बंगळुरुत एका रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. या रिक्षाचालकावर हल्ला का करण्यात आला? याबाबत आम्ही माहिती घेत आहोत असं पोलिसांनी म्हटलं आहे. जय श्रीरामच्या घोषणेवरुन झालेला वाद हे कारण असू शकतं पण मुळात वाद का सुरु झाला हे आम्ही तपासत आहोत असं पोलिसांनी म्हटलं आहे. रिक्षा चालकाला मारहाण झाल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
रिक्षा चालक वसीम अहमदने काय सांगितलं?
रिक्षा चालक वसीम अहमदने दिलेल्या माहितीनुसार २२ जूनला ही घटना घडली. त्याने सांगितलं, सहा ते आठ जणांचा जमाव त्याच्या रिक्षा जवळ आला. त्यांनी मला सांगितलं जय श्रीराम अशी घोषणा दे. मात्र मी नाही म्हणालो, ज्यानंतर त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. मी आणि माझा मित्र हेडगे नगर या ठिकाणी एका मोकळ्या जागी उभे होतो त्यावेळी २२ जूनला ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत काय?
या प्रकरणी सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यातही हे दिसून येतं आहे की वसीम अहमद जवळ काही लोक येतात आणि त्याला काहीतरी सांगतात. त्याने नकार दिल्यावर त्याला मारहाण करु लागतात. वसीमचा मित्रही त्याच्या बरोबर होता. मात्र जमावाने हल्ला केल्यानंतर तो कसाबसा जीव वाचवून तिथून पळाला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. या हल्ल्यात वसीमला जखमा झाल्या आहेत. तसंच त्याच्या उजव्या कानाच्या आतील बाजूलाही दुखापत झाली आहेयेला खाना सार्वजनिक रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी या घटनेबाबत वेगळी माहिती दिली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय म्हटलं आहे?
पोलीस उपायुक्त सजीत यांनी सांगितलं जय श्रीरामचा नारा देण्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला असा काहीही उल्लेख त्याने केलेल्या तक्रारीत नाही. तसंच जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्याचा संदर्भ वसीमने दिला आहे. मात्र त्याबाबत आम्ही तपास करत आहोत. पोलिसांनी या संदर्भात काही प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीही नोंदवल्या त्यांनीही हेच सांगितलं की वसीमला कुणीही जय श्रीराम ची घोषणा देण्यास सांगितलं नाही. आता नेमका हा प्रकार काय घडला याचा शोध आम्ही घेत आहोत असंही पोलीस उपायुक्तांनी म्हटलं आहे.